ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास भागात रिक्षा थांब्यालगत उभ्या असलेल्या तरुणाला कंटेनरची धडक बसली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. उमाशंकर शर्मा (३२) असे मृताचे नाव असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून पसार झाला होता.

भिवंडी येथे उमाशंकर शर्मा राहत होते. ते मूळचे उत्तरप्रदेश येथील सिद्धार्थनगर भागातील रहिवासी होते. मंगळवारी रात्री ११ वाजता ते भिवडी बायपास परिसरातील रिक्षा थांब्यालगत उभे असताना एक भरधाव कंटेनर त्यांच्या दिशेने आला. या कंटेनरची धडक उमाशंकर शर्मा यांना बसली. कंटेनरचे चाक उमाशंकर यांच्या शरिरावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर तेथेच सोडून पळून गेला. घटनेची माहिती उमाशंकर याच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी कंटेनर चालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.