Ahmedabad Plane Crash Emotional News : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताच्या घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. या अपघाताने अनेक कुटुंबांना कधीही न भरून निघणाऱ्या जखमा दिल्या आहेत. या भीषण अपघातात अमरेली जिल्ह्यातील वाडिया येथील रहिवासी अर्जुनभाई मनुभाई पटोलिया यांचाही मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तिचे अस्थी विसर्जन आणि दशक्रिया विधी पूर्ण करण्यासाठी अर्जुनभाई लंडनहून आपल्या मूळ गावी वाडियाला आले होते. मात्र, सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर ते १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानातून लंडनला जात होते. मात्र, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पटोलिया कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुनभाई पटोलिया यांच्या पत्नी भारतीबेन यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले, त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा होती की, त्यांच्या अस्थी अमरेली जिल्ह्यातील त्यांच्या वडिलोपार्जित गावातील नदीत विसर्जित कराव्यात. अर्जुन त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार, अस्थी कलश घेऊन लंडनहून गुजरातला आले. यानंतर त्यांनी अमरेली येथील त्यांच्या गावातील नातेवाईकांसह पत्नीचे काही अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले, त्यानंतर अस्थी कलश पत्नीच्या इच्छेनुसार त्यांच्या मूळ गावी विसर्जित केला. सर्व विधी पार पाडल्यानंतर ते पुन्हा आपल्या मुलांकडे लंडनला रवाना होण्यासाठी निघाले. मात्र, लंडनला पोहचण्याआधीच त्यांना मृत्यूने गाठले. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला.
अर्जुनभाईंना दोन मुले आहेत, जी सध्या लंडनमध्ये आहेत. ते मुलांना लंडनमध्ये सोडून पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी वाडिया येथे आले होते, मात्र या विमान अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
अर्जुनभाईंच्या पश्चात ८ वर्षे आणि ४ वर्षे वयाच्या दोन मुली आहे. पण या दोन्ही मुलींनी आईनंतर आता त्यांच्या वडिलांनाही गमावले. अर्जुनभाई यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यांची आई सुरतमध्ये राहते.