Kalu Waterfall Accident Viral Video : पावसाळा सुरू झाला की सर्व सृष्टी बहरून जाते. उन्हाळ्यात कडक्याच्या उन्हामुळे सुकलेली झाडे पुन्हा बहरू लागतात. ओसाड पडलेले डोंगर पुन्हा हिरवे दिसू लागतात. डोंगराच्या कड्या कपाऱ्यातून वाहणारे पाणी सुंदर झऱ्यांचे रूप घेतात. या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. झरे, धरण, डोंगर दऱ्या, गड किल्ले यांसारखे निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जातात. निसर्गाच्या सानिध्यात बागडण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण दरवर्षी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांचे अपघाती मृत्यूच्या घटना घडतात. कधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तर कधी लोक उत्साहाच्याभरात वाहवत जातात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीला वाचवण्याच्या नादात एक तरुण पाण्यात पडतो आणि वाहून जातो.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका धबधब्यावरील आहे जिथे काही पावसाळीपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले लोक दिसत आहे. दोरीच्या साहाय्याने काही लोक धबधबा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी दोरीच्या मदतीने धबधबा ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो त्यामुळे तरुणीला विरुध्द बाजूस पोहचण्यात अडथळा येतो. तरुणी अक्षरश: पाण्यात जात असल्याचे दिसते. कसे तरी दुसऱ्या बाजूला पोहचते आणि तिथे उभे असलेले लोक तिला ओढून वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणीला लोक बाहेर काढतात पण तरुणीला बाहेर काढण्यासाठी एक उत्साही तरुण पुढे येतो आणि तोल जाऊन त्या वाहत्या पाण्यात पडतो. पाण्याचा वेग इतका असतो त्याला सावरण्याची संधीच मिळत नाही. तो दोरीला पकडण्याचा प्रयत्न करतो पण अखेर त्याचा हात सुटतो आणि तो पाण्यात वाहून जाताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा जीव वाचला की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. व्हिडीओमध्ये कमेंट करत काहींनी व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे.
व्हायरल व्हिडिओ pune_travelling_’s नावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा., या अवकाळी पावसात अती वृष्टी होत असल्यामुळे, अचानक पाण्याचा प्रवाह कमी जास्त होतो त्यामुळे बाहेर जाणे टाळा.” तसेच व्हिडीओवर लिहिलेल्या आशयानुसार हा व्हिडिओ काळू धबधबा येथील असल्याचे समजते.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, “पोरीला वाचवण्याचा शहाणपणा करायची काही गरज नव्हती.”
दुसऱ्याने म्हटले की,”व्हिडीओ जुना आहे पण उपदेश तोच आहे. काळजी घ्या किंवा अशा ठिकाणी जाणे टाळा.”
पावसाची सद्यस्थिती
राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरवर्षी मान्सूनचे ८ जूनला आगमन होते. यंदा मात्र मान्सूनचे लवकर /आगमन झाले आहे. केरळमध्ये देखील ८ जून अगोदरच आगमन झाले आहे. तर काल तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. आज मुंबईपर्यंत त्याचं आगमन झालं आहे. पुणे, सोलापूरमध्ये देखील मान्सून आज दाखल झाला आहे. मुंबईत आज अतिवृ्ष्टी होण्याची शक्यता असून पुढील चार दिवसांसाठी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे. जोरदार पावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. पुढील पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.