Heartbreaking Viral Video : शेतकऱ्याचं जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, कीटकांचा प्रार्दुभाव अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. पिकाच्या लागवडीपासून ते शेतमाल विकेपर्यंत शेतकऱ्याला धडपडावे लागते. कितीही चांगला शेतमाल असला तरी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे सध्याचा शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि कमी बाजारभाव अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. यात शेतकऱ्याचे अधिक नुकसान नैसर्गिक आपत्तीच्यावेळी होतं. अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर पीक वाहून जात होतं, पण…

सध्या राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच अवकाळी पावसात एका शेतकऱ्याच्या भुईमूगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्या. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या शेंगा वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती, पण पाण्याचा प्रवाहच इतका अधिक होता की डोळ्यांसमोर पीक वाहून जात होतं, पण त्याला काहीच करता येत नव्हतं. मन हेलावून टाकणारे हे दृश्य आहे; जे पाहिल्यानंतर वाटते की, अशी वेळ चुकूनही कोणत्या शेतकऱ्यावर येऊ नये. हा व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

शेतकऱ्यांची शेतमाल वाचवण्यासाठी अक्षरश: धावाधाव

वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्याबरोबर ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी तिथे अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाल वाचवण्यासाठी अक्षरश: धावाधाव सुरू झाली. पण पावसाचा जोर इतका अधिक होता की, शेतकऱ्यांनी व्रिकीसाठी आणलेलं भुईमूग, हरभरा, तूर, मूग असं धान्य प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागलं.

व्हिडीओतही शेतमाल कशाप्रकारे वाहून जात आहे ते दिसते, ज्यात एक शेतकरी पाण्याच्या प्रवाहासह वाहून जाणारं पीक वाचवण्यासाठी कसा जीव तोडून प्रयत्न करतोय हे दिसतेय. अक्षरश: रस्त्यावर झोपून पूर्ण ताकदीने तो वाहून जाणाऱ्या शेंगा अडवत गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, पण पाण्याचा वेग इतका जास्त आहे की, त्याच्या डोळ्यासमोर कष्टाने पिकवलेला शेतमाल वाहून जातोय, पण तो काहीच करू शकत नाही. हे दृश्य पाहून तो पूर्णपणे खचून जातो, जे त्याच्या कृतीतूनही दिसून येते.

पण, अशाप्रकारे मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून वाहून गेला, त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करतायत. तसेच सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, या मागणीला आता नेटकरीदेखील पाठिंबा देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक जण हा व्हिडीओ पाहून खूप भावूक झाले. अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये, अशी प्रार्थना ते करत आहेत. तर अनेकांनी माणुसकी म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी कळकळीची विनंती सरकारकडे केली आहे.