Mumbai Rain Andheri Subway Viral Video : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाने कहर केला, शहरातील अनेक भागांत जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावली, अनेक ठिकाणी झाडे कोसळली. बोरिवली, मालाडसह काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली, रस्त्यांवरील वाहनांचा वेग मंदावला, पावसामुळे रस्ते वाहतूकच नाही, तर रेल्वे वाहतुकीवरही परिणाम दिसून आला. त्यात बुधवारीदेखील मुंबईत पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली बुडाला. याच अंधेरी सबवेतील एक भीषण व्हिडीओ समोर आला आहे.
ज्यावरून अनेकांनी बीएमसीच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे; तर अनेकांनी एका पावसात अंधेरी सबवेची झालेली ही दुरवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यांना अक्षरश: डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पहिल्याच पावसात अंधेरी सबवेमधील रस्त्यावर घाणीच्या पाण्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसतेय. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना हे दृश्य पाहून रस्ता आहे की कचऱ्याची भलीमोठी पेटी, असा प्रश्न पडला आहे. कारण- रस्त्यांना अक्षरश: डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. प्रवाशांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतोय.
बीएमसीवर उठवली टीकेची झोड
अंधेरी सबवेतील या भीषण स्थितीचा व्हिडीओ @24sagar06 या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ टॅग करीत लिहिले की, @PMOIndia @CMOMaharashtra साहेब, मुंबई अशी दिसायला नको…! मदत करा!
या व्हिडीओला हजारहून अधिक व्ह्युज मिळाले. अनेक सोशल मीडियावर अनेकांनी या परिस्थितीवरून बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra Please sir, this isn't what Mumbai should look like..! Help! pic.twitter.com/5aym9fnKbs
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sagar Shah (@24sagar06) May 20, 2025
मुंबईचे स्मार्ट सिटीचे स्वप्न कधी पूर्ण करणार? मुंबईकरांचा सवाल
एका युजरने लिहिले की, मुंबई महापालिकेच्या हद्दीत जेवढे नाले, नद्या व गटारे आहेत, ती वर्षभरात साफ होत नाहीत म्हणून ऐन पावसाळ्यात ही सर्व परिस्थिती दिसते. एखाद्या शहराची क्षमता असते; आता मुंबईची क्षमता संपली आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, काही वर्षांपूर्वी अंधेरी-कुर्ला भागात पाणी साचत नव्हते; पण आता थोडासा जरी पाऊस पडला तरी संपूर्ण जागा पूरग्रस्त होत आहे – काय चूक झाली? तिसऱ्याने लिहिले की, मुंबईकरांकडून जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी देण्याच्या नावाखाली मालमत्ता कर, रस्ते कर, दंड आदी वसूल केला जात आहे. पण, स्मार्ट सिटीचे स्वप्न कधी पूर्ण करणार? दरम्यान, अनेकांनी या परिस्थितीवरून पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत ही फार लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्स करुन जरूर कळवा.