Arunachal Pradesh Rain : ‘अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी आलेले पूर आणि भूस्खलन यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला’अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. ‘शुक्रवारी रात्री पूर्व कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३जवळ भूस्खलन होऊन एक वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांमधील सात जणांचा मृत्यू झाला,’ असे पोलिसांनी सांगितले. राज्यात पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील एका चित्तथरारक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक माणूस आपला जीव धोक्यात घालून खराब झालेल्या झुलत्या पुलावरून धोकादायकरित्या पूर आलेली नदी ओलांडताना दिसत आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त मान्सून : किरेन रिजिजू
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,”अरुणाचल प्रदेशमध्ये यावर्षी जगातील सर्वात जास्त मान्सून पाऊस पडला आहे.
“भारत, चीन आणि म्यानमार सीमेजवळील अंजाव जिल्ह्यात पारंपारिक झुलता पूल ओलांडणाऱ्या माणसाचाहा व्हिडिओ मला मिळाला. कृपया काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. सरकार आवश्यक ती मदत करेल,” असे रिजिजू यांनी ट्विट करून सांगितले. दरम्यान, त्या माणसाला वाचवण्यात आले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “त्याला सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा का बांधत नाही?” दुसऱ्याने कमेंट करत म्हटले की, “खतरों के खिलाडी” तिसऱ्याने कमेंट करत म्हटले की, “हा खरा व्हिडिओ आहे का रिजिजू जी? मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. तो पूल पाण्याच्या प्रवाहाचा सामना करू शकेल इतका मजबूत आहे का? स्थानिक लोक असाच प्रवास करतात का? आणि त्या मुलाचे धाडस पहा !! बाप रे! हे खूपच अवास्तव आहे.”
अरुणाचल प्रदेशमध्ये ३० मे पासून मुसळधार पाऊस
अरुणाचल प्रदेशमध्ये ३० मे पासून सतत पाऊस पडत असल्याने आणि असंख्य भूस्खलनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अरुणाचल प्रदेश सरकारने अलिकडच्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शोक व्यक्त केला आणि जिल्हा प्रशासनामार्फत बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत मिळेल असे आश्वासन दिले. राज्य सरकारने रहिवाशांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे, विशेषतः रात्रीच्या वेळी, आणि सततच्या मुसळधार पावसात नद्या आणि जलसाठ्यांमध्ये जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग आणि केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यभर आपत्कालीन प्रतिसाद पथके हाय अलर्टवर आहेत.