Vat Purnima 2024 Video: पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव इथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. महिलांच्या हक्काचा सण अशी ओळख असलेल्या वटपौर्णिमेला पुरुषांनी वडाला फेरे मारणे हा उपक्रम यापूर्वीही काही संस्थांनी राबवला होता, अनेकदा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात यायचे किंवा खिल्ली उडवली जायची. पण या खिल्ली उडवणाऱ्यांच्या पलीकडे जाऊन स्त्री- पुरुष समानतेला महत्त्व द्यायला हवे या विचाराने मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम यंदाही राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष व सदस्यांनी आपापल्या पत्नीसह वटवृक्षाला सात फेरे मारले. हे या संस्थेचे दहावे वर्ष आहे मागील ९ वर्षांमध्ये संस्थेने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्य सुद्धा केले आहे. आजच्या या कार्यक्रमात सहभागी मंडळींनी लोकसत्ताशी बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

मानवी हक्क संरक्षण संस्थेचे संस्थापक व शहर अध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले की, “वटपोर्णिमा हा सण महिलांचा म्हणून ओळखला जातो. महिला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आजच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून वटवृक्षाला सात फेरे मारून प्रार्थना करतात. परंतु, याच परंपरेला छेद देत आम्ही पुरुषांनी पुढे येऊन वटवृक्षाला पत्नीसह स्वतः देखील सात फेरे मारून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना केली आहे. ” तर संगीता जोगदंड यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले की, “पुरुषांनी केलेली वटपौर्णिमा पाहणं हे आनंददायी आहे. हे वैवाहिक एकनिष्ठता व पावित्र्याचे उदाहरण आहे.”

दुसरीकडे, देशात आणि राज्यात केवळ स्त्री- पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? याबाबत साशंकता सुद्धा संस्थेतील काही सदस्यांनी व्यक्त केली आहे. पुरुषांनी वेगळा उपक्रम घेऊन स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र नक्की शोधाव लागेल असे म्हणत यावेळी वसईत घडलेल्या घटनेचा तीव्र संताप महिलांनी बोलताना व्यक्त केला.

स्त्री पुरुष समानता केवळ कागदोपत्री

देशात आणि राज्यामध्ये स्त्री-पुरुष समानता या केवळ पोकळ गप्पा आहेत, या समानतेच्या गोष्टी कागदोपत्रीच आहेत प्रत्यक्षात त्याचा अवलंब व्हायला हवा. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने या पुरुषांनी आम्हाला आम्ही सुद्धा समान आहोत हे दाखवून देण्याची सुरुवात केली आहे, असे मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या सदस्या संजना कारांजवणे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा<< “राब राब राबतात बिचाऱ्या सुना..” सासूबाईंची तक्रार करत सुनांनी केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेसाठी वडाची फांदी तोडली जाते पण आम्ही अशा प्रकारे कुठल्याही झाडाचे नुकसान करणार नाही उलट वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न करू. तसेच या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही ५०० वडाच्या रोपांचे वाटप करणार आहोत असे संस्थेचे सदस्य अरुण पवार यांनी सांगितले.