पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांना एक वर्ष पूर्ण होण्याआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर सोशळ मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेटकरी याचा संबंध आगामी निवडणुकांशी जोडत असून काहीजण हा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हणत आहे.
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, पंतप्रधान मोदींची घोषणा
कृषी कायदे मागे घेताना काय म्हणाले पंतप्रधान मोदी? जाणून घ्या सविस्तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी बोलताना सांगितलं की, “शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. कदाचित आम्ही यामध्ये कमी पडलो. भलेही शेतकऱ्यांचा एक गट याचा विरोध करत असला तरी आम्ही हे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे”.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका युजरने ट्विटरला म्हटलं आहे की, “पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांनी मोदींना खूप काही शिकवलं आहे. आधी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी आणि आता तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय…दुनिया झुकते फक्त झुकवणारा पाहिजे”.
दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, “शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांना आदरांजली….तुमचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. मोदींना अखेर झुकावंच लागलं. शेतकरी एकजुटीचा विजय!”.
दरम्यान काही युजर्स कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचा विरोधही करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “हे खुपच वाईट आहे की, काही जणांमुळे हे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कृषी कायद्यांचं महत्व त्यांना माहिती होतं जे नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक झाले होते आणि शेतीसाठी आपल्या घरी जाऊ शकत नव्हते”.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलं. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असं पंतप्रधान म्हणाले.