Shocking video: भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही नेहमीच तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल असं नाही. सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो.आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे.

त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पावसाळ्यात खात असलेल्या भाज्यांबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या खायच्या बंदच करायच्या, असा सवाल उपस्थित होतोय. सध्या असा समोर आला आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पालेभाजी विकत घेताना शंभर वेळा विचार कराल.

बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तु्म्ही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील. पालकची कुजलेली भाजी एका केमीकलमध्ये बुडवून पुन्हा ती हिरवीगार करुन विकली जात असल्याचं दिसत आहे. आता विचार करा हे एवढं केमीकल आपल्या पोटात गेलं तर काय होईल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rajdhani_satara03 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” “जगायचं की नाही” अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्यानं खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.