तामिळनाडूमधील एक पोस्टमन सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात डिजीटल जमान्यामध्ये पोस्टमन हा चर्चेचा विषय ठरु शकतो याबद्दलच आश्चर्य व्यक्त केलं पाहिजे. मात्र सध्या ट्विवटर या पोस्टमनला योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे असं मत अनेकजण ट्विटवर व्यक्त करताना दिसत आहे. डी. सिवन असं या पोस्टमनचं नाव असून पोस्टात ३० वर्ष सेवा केल्यानंतर सिवन नुकतेच निवृत्त झाले आहेत. सिवन मागील ३० वर्षांपासून तामिळनाडूमधील डोंगराळ भागांमध्ये पत्र पोहचवण्यासाठी १५ किमी पायी प्रवास करायचे. रोज १५ किमी प्रवास तसं वाचायला एवढं काही जास्त वाटत नसलं तरी सिवन ज्या भागांमध्ये पत्र पोहचवण्याचे काम करायचे तेथील भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास त्यांचे काम किती कष्टाचे होते याचा अंदाज येईल.

सिवन पत्र पोहचवण्यासाठी ज्या भागामधून चालत जायचे तो जंगली प्रदेश आहे. अनेकदा या रस्त्यांवर दूर दूरपर्यंत कोणी दिसत नाही. सिवन यांच्या सांगण्यानुसार इतक्या प्रदीर्घ सेवेच्या कालावधीमध्ये अनेकदा त्यांचा सामना जंगली प्राण्यांशी झाला आहे. यामध्ये अगदी सापांपासून जंगली अस्वलांपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. एकदा तर चक्क हत्तीच्या एका टोळीने सिवन यांचा रस्ता अडवला होता. ‘द हिंदू’मध्ये २०१६ साली प्रकाशित झालेल्या सिवन यांच्यासंदर्भातील लेखानुसार त्यांचा पगार महिन्याला १२ हजार रुपये इतका होता.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन सिवन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मागील ३० वर्षांमध्ये मन लावून काम करणाऱ्या सिवन यांची साहू यांनी स्तृती केली आहे. “पोस्टमन डी. सिवन रोज घनदाट जंगलामधून १५ किमी चालत जायचे. कुन्नूरमधील दूर्गम भागांमधील पत्र पोहचवण्याचे काम ते करायचे. अनेकदा जंगली हत्ती, अस्वलांनी त्यांचा पाठलाग केला आहे. निसटणाऱ्या पायवाटा, धबधबे यांच्यामधून वाट काढून ते आपले काम करायचे. मागील ३० वर्षांपासून सेवा देणारे सिवन मागील आठवड्यात निवृत्त झाले,” अशी कॅप्शन साहू यांनी सिवन यांचा पुलावरुन चालताना फोटोला दिली आहे.

साहू यांची ही पोस्ट ११ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केली असून ५६ हजारहून अधिक जणांनी लाइक केली आहे. तसेच ९०० हून अधिक जणांनी त्यावर कमेंट केली आहे. अनेकांनी सिवन हे खरे हिरो असून त्यांच्या कामासाठी त्याचे कौतुक केलं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.