सध्या राजस्थानमधील एका दुकानाबाबत अनोखा दावा केला जात आहे. सांगितलं जात आहे की, येथील एका दुकानातील चूल १९४९ सालापासून पेटती आहे ती कधीही विझलेली नाही. राजस्थानच्या जोधपूरमध्ये हे दुकान असून या दुकान उघडल्यापासून दुकानातील चूल विझली नसल्याचा दावा केला जात आहे. सध्या या दुकानाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ही घटना व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील सोजती गेटजवळ असलेल्या एका दुधाच्या दुकानाच्या मालकाने असा दावा केला आहे की, दूध गरम करण्यासाठी वापरली जाणारी चूल १९४९ पासून जळत आहे. दुकानाचे मालक विपुल निकुब म्हणाले, “माझ्या आजोबांनी १९४९ मध्ये पेटवलेली चूलीची ही ज्योत १९४९ पासून आजपर्यंत चालू आहे.”
दुकानदाराचा दावा ऐकून नेटकरी आश्चर्यचकित –
एका सोशल मीडिया युजरने प्रश्न विचारला, “लॉकडाऊन दरम्यान हे दुकान चालू होते का?” त्यावर दुसऱ्या एकाने सांगितले, “या जागेचे नाव दूध मंदिर असून ते दोन भाऊ चालवतात. तर आतली गोष्ट अशी आहे की, एक भाऊ सोमवार, बुधवार, शुक्रवारचे पैसे घेतो, तर दुसरा भाऊ मंगळवार आणि शनिवारचे पैसे घेतो.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “मी या दुकानातील दूध प्यायलो आहे, इथे शुद्ध दूध मिळते पण चूलीबद्दलची गोष्ट मला माहिती नव्हती.”
सजेश कुमार नावाच्या युजरने लिहिलं, “दुकानदार खोटं बोलत आहे, जो लॉकडाऊनमध्ये कोण दूध प्यायला यायचं?” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे कसे होऊ शकते? कोविड काळात हे दुकान बंद झाले नाही का?” एएनआयशी बोलताना दुकानदाराने सांगितलं, त्यांचे दुकान दररोज २२ ते २४ तास चालते. दूध पारंपारिकपणे कोळसा आणि लाकडाच्या साह्याने गरम केले जाते, दुकानाला सुमारे ७५ वर्षे झाले असून त्यांची कतिसरी पिढी ते चालवते.”