मान वर करून आभाळाकडे पाहिले. चांदण्यांचे थवे आभाळावर अलगदपणे विहार करत होते. चंद्र दिसत नव्हता. बहुतेक ढगाआड विश्रांती घेत असावा. तरीही त्याची श्वेत काया ढगाआडून शुभ्र प्रकाशाची मंद फुंकर मारत होती. किती विलोभनीय सौंदर्य आभाळाचं. अवघ्या धरतीला कवेत घेणारं. आभाळमाया म्हणतात ती हीच असेल का?

किती दिवसांनंतर आभाळाकडे पाहिलं होतं, तेही इतकं प्रेमाने. सवडीने आभाळाकडे पाहायचं विसरून गेलोय आपण. आपण म्हणजे आपली अख्खी नवी पिढीच. आम्ही त्या नवीन पिढीतले थोडे वयस्कर. आभाळाला पारखे झालोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजकाल मोबाइलमुळे मान वर करण्याची सवयच सुटून गेलीयं. तेच कारण असावं, पण ते एकमेव कारणही नसावं.

चिंता कुणाला नाहीत? राजापासून रंकापर्यंत अन् दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच जीव चिंतेचं गाठोडं घेऊन जगतायत. प्रत्येकाच्या चिंतेचं वर्तुळ गरजांच्या त्रिज्येवर अवलंबून. जगण्याची अशी सोपी भूमिती.

पदोपदी चिंता वाहणारी नवी पिढी. दुर्भाग्य म्हणजे आईवडिलांच्या कुशीत शिरून चिंता हलक्या कराव्या तर कुठलंसं अनामिक अवघडलेपण आलेलं. मोठे झाल्याची किंमत म्हणा पाहिजे तर. अशा वेळी आभाळाचा आधार घ्यावा का? विसरून गेलोय आपण. नीरव शांततेत गाव अंगावर झोपेची चादर ओढत असताना आपण आभाळाच्या स्वाधीन व्हायचं. किती अनुपम, अलौकिक, अतुल्य आभाळ. बघत बसायचं आभाळाचं अमर्याद रूप. बोलायचं त्याच्याशी. एक मूक संवाद. आभाळांच्या लेकरांचा त्याच्या आईशी. सांगावं आभाळाला आपलं दुखणं-खुपणं. चुका कबूल कराव्यात. मन हलकं करावं. मागावं त्याच्याकडून आपलं अडलेलं मागणं. आभाळाची ओंजळ भरलेलीच असते, आपल्याला देण्यासाठी. आपण मात्र दुरावलेले असतो, आभाळमायेपासून. खरंच तुटलीय का आपली नाळ आभाळापासून?

चंद्र ढगाआडून बाहेर आलाय. चांदण्याचा सडा अंगणी सजलाय, तोही न मागता. चंद्र खुणावतोय आपल्याला. आभाळाबरोबर तुटलेली नाळ जोडण्यासाठी, तो साद घालतोय. आभाळ वाट पाहतेय आपली. त्याच्या ओंजळीतून आपली ओंजळ आभाळमायेने भरण्यासाठी. गरज आहे एका नजरेची, आभाळाकडे लागलेली.
सचिन मेंडिस – response.lokprabha@expressindia.com