विरार :  वसई विरारवासीयांना मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे. यामुळे दरवर्षी नालेसफाईचा मुद्दा पावसाळ्याअगोदर गाजला जातो. याही वर्षी पालिकेची नालेसफाईसाठी ठरलेली मुदत संपली तरी  काम अजूनही पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांना पुन्हा पूरस्थितीचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार महानगरपालिकेने ३१ मे पर्यंत शहरातील नालेसफाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. पण मुदत संपूनही शहरातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नसल्याने  शहरात पुन्हा पाणी तुंबले जाणार आहे. पालिकेने ८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. पण शहरातील नाल्यांची स्थिती पाहता ६० टक्कय़ाहून अधिक काम झाले नसल्याचे चित्र दिसत आहे.

पालिकेने निरी आणि आयआयटीसारख्या संस्थांची १२ कोटी रुपये खर्च करून मदत घेतली होती.  निरी आणि   आयआयटीने दिलेला अहवाल अजूनही धूळ खात पडले आहेत.   पालिकेने मागील वर्षी केवळ चार कोटी रुपये  खर्च करून नालेसफाई केली असल्याचे सांगितले होते. पण या वर्षी अजूनही काम पूर्ण झाले नाही.  पावसाळ्यात दरवर्षी नालासोपारा परिसराचे मोठे हाल होतात. सेन्ट्रल पार्क, ओस्वाल नागरी, आचोळे, टाकी रोड, हनुमान नगर, विजय नगर हे परिसर सातत्याने पाण्याखाली जातात.

नाल्यांना जोडणारे नागरी वस्तीतील छोटे नाले अजूनही सफाईच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षभर या नाल्यात कचरा, प्लास्टिक, गाळ, आणि इतर कचरा साचून हे नाले तुंबले  जातात. पाणी साचून राहून रोगराई पसरण्याची भीती वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका चाळीतील नागरिकांना सहन करावा लागतो.

दरम्यान, नालेसफाईचे काम जलद गतीने सुरू आहे, थोडेसे काम बाकी आहे. ते कामही पावसाच्या अगोदर केले जाईल. आणि १०० टक्के नालेसफाईचे लक्ष आम्ही आठवडाभरात पूर्ण करू, असे आश्वासन बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र लाड यांनी दिले आहे.