भाईंदर – ठाणे -घोडबंदर मार्गावरील घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. परिणामी रहदारीच्या वेळी वाहनांना हे अंतर पार करण्यासाठी अधिकचा एक तास वाया घालवावा लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहे.

ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. याशिवाय या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी येथील घाट मार्गांवर खड्ड्याचे साम्राज्य उभे राहते. यंदा ही या मार्गांवर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. परिणामी या खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर अवजड वाहन उलटण्याची दाट शक्यता असल्याने हे चालक वाहनाचा वेग अतिशय मंद ठेवून चालवत आहे. परिणामी संथ गतीने सुरु असलेल्या या वाहतुकीमुळे रहादारीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या उभी राहत आहे.

पावसाच्या हजेरीत या मार्गावर किमान अर्धा ते एक तास अधिकचा वेळ वाया घालवावा लागत आहे. या बाबत अनेक प्रवासी समाज माध्यमांवर शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र याकडे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्षपणा करत असल्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वर्सोवा पुलावर कोंडी

ठाण्याच्या दिशेने सुरु असलेली वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत.यामुळे वर्सोवा पुलावरील मुंबई – अहमदाबाद महामार्गावर देखील वाहतूक कोंडीची समस्या उभी राहू लागली आहे. प्रामुख्याने अवजड वाहनांमुळेच ही कोंडी उभी राहत असल्यामुळे त्याना पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याची रुंदी वाढवण्याचा प्रस्ताव

दहिसर मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोसाठी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रस्तावित आहे. या मार्गाखाली गायमुख ते फाउंटन ३९ मीटरचा रस्ता ६० मीटरपर्यंत वाढविण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात जवळपास २० टक्के जागा ही वन विभागाची बाधित होणार आहे. त्यामुळे वन विभागाची मंजुरी घेण्यासाठी तसेच जागा हस्तांतराची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेला दिले आहेत.