सुहास बिऱ्हाडे

वसई :  मुंबई आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे आता वसई, विरार शहरांतही महारेलतर्फे ४ रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्यात येणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांच्या निर्मितीचे काम महारेलला (महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात लवकरच एमएमआरडीए, वसई विरार महापालिका आणि महारेलमध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या पुलांच्या निर्मितीनंतर वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा >>> पोलिसांच्या तावडीत फरार झाल्यानंतर ३ ठिकाणी केली चोरी

वसई, विरार शहरांचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहरांची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. मात्र, शहरांतील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळा (वसई), आचोळे (नालासोपारा), अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपुलांचा समावेश होता. यासाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, निधी अभावी उड्डाणपूल निर्मितीचे काम रखडले होते.

हेही वाचा >>> नालासोपार्‍यात हुंडाबळी, हाताच्या तळव्यावर लिहून नवविवाहितेची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या पुलांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे काम महारेलकडे सोपविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी संचालक (वित्त) सुभाष कवडे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. चार रेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यास पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतूक कोंडीची समस्या ५० टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला.