वसई:- मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने महावितरणचे अधिकारी आणि वसईतील उद्योजक यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत विजेअभावी संतप्त झालेल्या उद्योजकांनी तक्रारींचा पाऊस पाडत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
मंगळवारी गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात कामण यासह विविध भागांतील उद्योजक व महावितरण यांची वीज समस्यांच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंता संजय खंडारे व विभागीय सहायक अभियंता, तर गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अशोक ग्रोवर, किशोर शेट्टी यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
या बैठकीत उद्योजकांनी वीजेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. विशेषतः यात मागील काही दिवसांपासून कामण – पोमण भागात नालासोपाऱ्यावरून पुरवठा करणाऱ्या २२ किलोमीटर वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड वीज जाऊ लागली आहे. त्यामुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ येथील उद्योजकांवर आली आहे. याशिवाय जे मंजूर केलेले २२०/ २२ केव्हीचे उपकेंद्र अजून तयार होत नाहीत केवळ त्याचे काम सुरू आहे, पाठ पुरावा सुरू आहे अशी फसवी उत्तरे दिली जात असल्याचे हेमंत शेट्टी यांनी यावेळी सांगितले. अजूनही महावितरणने केंद्राचा आराखडा तयार केला नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
तर अनेक वर्षे जुनी झालेली वितरण व्यवस्था बदलली नाही. त्याउलट त्यावर अतिभार देऊन वीज पुरवठा सुरू आहे. त्यामुळे वाहिनी ट्रीपिंग होते आहे. त्यात आमचे नुकसान होत आहे उद्योजक हेमंत कोठारी यांनी सांगितले आहे. दिवसा वीज नसल्याने कामगारांकडून रात्र पाळी करवून काम पूर्ण करावे लागते त्यांना दीड पट पगार ही मोजावा लागतो त्यात वीज गेली तर आणखीनच नुकसान सहन करावे लागते असेही कोठारी यांनी सांगितले आहे. वीज गेल्यानंतर महावितरणचे कर्मचारी व अधिकारी योग्य रित्या सहकारी करीत नसल्याचे मत ही अनेक उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
विविध ठिकाणी प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यामुळे जेसीबी लावून खोदकामे होतात त्यात वीज वाहिनीत तांत्रिक अडचणी येतात. त्याठिकाणी कोणताही मार्गदर्शक फलक नसल्याने असे प्रकार सतत घडतात त्यावर कारवाई केली जात महावितरण कारवाई करीत नाहीत. अशा महावितरणच्या विविध प्रश्नांना घेत उद्योजकांची एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवल्याने त्यांची उत्तरे देतानाही महावितरण अधिकाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाली. महावितरणने येत्या काही दिवसात वितरण व्यवस्था सुधारली नाही तर त्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही उद्योजकांनी दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
नालासोपारा ते कामण २२ किलोमीटरची जुनी वाहिनी बदलून नवीन वाहिनी अंथरणे
जिथे वाहिनी अंथरली आहे तिथे सूचना फलक व महावितरणचा संपर्क क्रमांक लावा
पोमण येथील उपकेंद्रांचे काम लवकर पूर्ण करा
काही कामे होण्यास विलंब होणार आहे त्यामुळे तात्पुरता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
पावसाळ्यात अधिक ट्रीपिंग होते तेव्हा त्यावर उपाययोजना करा
महावितरणचे म्हणणे काय ?
विजेच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. खोदकामात वीज वाहिन्यांचे नुकसान होते. त्यासाठी आता ज्या भागात भूमिगत वाहिन्या आहेत तिथे एका महिन्याच्या आत सूचना फलक लावले जातील. तर नवीन उपकेंद्राच्या संदर्भात पुढील आठवड्यात आराखडा तयार केला जाईल व येत्या आठ ते नऊ महिन्यात काम पूर्ण केले जाईल असे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले आहे. तसेच जुनी झालेली वाहिनी बदलली जाईल सुरवातीला २२ किलोमीटर पैकी ८ ते १० किलोमीटर पर्यंत वाहिनी टाकली जाईल तसेच जी आता कामे होतील ती पुढील २० वर्षाचे नियोजन करून केली जातील असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.