भाईंदर : उत्तन येथील चौक परिसराला बांगलादेश नाव दिल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मनसेने शनिवारी रात्री बसथांब्याचे बांगलादेश नाव असलेल्या फलकाला काळे फासून फलक काढून फेकला. तर ‘बांगलादेश’ नाव शासकीय कागदपत्रातून काढून टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन गावातील गावात चक्क एका परिसराला ‘बांगलादेश’ असे नाव देण्यात आले होते. मालमत्ता देयक, आधारकार्ड, बसस्थानक आणि इतर महत्वाच्या शासकीय कागदपत्रातही ‘बांगलादेश’ हे नाव नमूद करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’ने शनिवार, १७ जून रोजी या बाबतचे वृत्त प्रसिध्द करताच एकच खळबळ उडाली होती.
शनिवारी रात्री संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी ‘बांगलादेश’ नाव असलेल्या बसथांब्याच्या फलकाला काळे फासले आणि हा फलक काढून फेकला. देशात बेकायदा देण्यात आलेले ‘बांगलादेश’ हे नाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
वृत्त प्रसिध्द होताच पालिकेतही खळबळ उडाली होती.ज्या वसाहतीला इंदिरा नगर असे नाव होते त्याला बांग्लादेश नाव कागदोपत्री कुणी दिले याची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
हा घोळ निस्तरण्यासाठी सोमवारी आयुक्त ढोले यांनी सर्व विभागाच्या उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व शासकीय कागदपत्रातून बांग्लादेश नाव वगळण्याचे आदेश दिले. या परिसराचे मूळ नाव असलेले इंदिरा नगर,चौक हेच नाव वापरावे असे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान, मालमत्ता देयकात बांगलादेश हे नाव लिहून आलेले आहे. ते रद्द करून त्या ठिकाणी ‘इंदिरा नगर चौक’ असे केले जाईल. तसेच बस थांब्याला देखील पूर्वीचे इंदिरा नगर चौक नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले आहे.
१९९३ पासून इंदिरा नगर वसाहत
१९९३ साली लातूर भूकंपानंतर काही कुटुंबे येथे स्थलांतरीत झाली होती. तेव्हापासून या वसाहतीला इंदिरा नगर वसाहत असे नाव संबोधण्यात येत होते, असे खासदार राजन विचार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे नाव तात्काळ बदलावे अशी मागणी त्यांनी केली. ठाणे जिल्हा परिषदेने इंदिरा आवास योजनेअंतर्गत अल्पभूधारकांना या भागात १५ घरे बांधून देण्यात आली होती. तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्री विलास सावंत यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.