भाईंदर : नालेसफाईच्या कामादरम्यान नाल्यातील गाळ थेट झाडांच्या खोडांवर टाकण्यात येत असल्याचा प्रकार मिरारोड येथे उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींनी पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिरा-भाईंदर शहरात सध्या महापालिकेमार्फत अंतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. या मोहिमेत नाल्यातील गाळ रस्त्याच्या कडेला काढून ठेवण्यात येतो आणि तो दोन दिवसांनी सुकल्यानंतर उचलला जातो. मात्र, मिरा रोड येथील विनय नगर परिसरात हा गाळ थेट झाडांच्या खोडांवर टाकण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या परिसरातील सुशोभीकरण केलेली झाडे अशा प्रकारामुळे पुन्हा घाणीत अडकली आहेत.
नाल्यातील गाळामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असतात, जे झाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या या निष्काळजी कृतीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वीही झाडांच्या खोडांवर डांबर, सिमेंट, तसेच कचरा टाकण्याचे प्रकार घडले होते. मात्र, प्रशासनाकडून या गोष्टींकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी केली आहे.तर यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच संबंधित गाळ हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कंत्राटदाराला नोटीस :
झाडांच्या खोडावर नाल्याचा गाळ टाकण्यात येत असल्याची तक्रार कृष्णा गुप्ता यांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली होती.त्यावरून नाले सफाई करणाऱ्या कंत्राटदाराला प्रशासनाने नोटीस बजावली असून या प्रकरणी खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दंडात्मक कारवाई :
मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन लहान नाल्याच्या सफाईचे काम केले जात आहे.प्रामुख्याने हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने पालिकेत सेवा देत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाकडून कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील अनेक कर्मचारी जीव धोक्यात टाकून नाल्यांची स्वच्छता करत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे या प्रकरणी सक्त पाऊल उचलत प्रशासनाने प्रति कर्मचारी कंत्राटदाराला २० हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.