भाईंदर – उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान केले जाणार असून, नागरिकांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा-दहिसर-भाईंदर असा २२ किमी सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतल्याने, एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करून “उत्तन ते विरार” सागरी सेतू प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पास शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी ८७,४२७.१७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात एकूण ५५ किमीपैकी २४ किमी लांबीचा प्रत्यक्ष सागरी सेतू, १० किमीचा उत्तन आंतरबदल मार्ग (कनेक्टर), २.५ किमीचा वसई आंतरबदल मार्ग, आणि १९ किमीचा विरार आंतरबदल मार्ग यांचा समावेश आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास दक्षिण मुंबईहून थेट विरारमध्ये काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार, व्यवसायिक व इतर घटकांवर होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मूल्यांकन सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये बाधितांचे स्थलांतर, उपजीविकेवर होणारे परिणाम, मालमत्तेवर होणारे परिणाम यांचा समावेश असेल.या सर्वेक्षणासाठी ‘पेंटेकल-सेमोसा जिव्हा’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था गावागावांत जाऊन माहिती गोळा करणार असून, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एमएमआरडीएने अधिकृत पत्रकाद्वारे केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मच्छीमारांचा विरोध कायम

उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पास उत्तनच्या मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या मार्गामुळे मासेमारीचा व्यवसाय पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या मार्गात बदल करण्याची मागणी केली आहे. परिवहन मंत्र्यांनीही ही मागणी मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.मात्र, या मागणीवर अद्याप ठोस उत्तर मिळालेले नसल्यामुळे मच्छीमारांचा विरोध कायम आहे. त्यांची भूमिका ठाम असून, प्रकल्पात फेरबदल होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.