लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपार्‍यात एका विचित्र घटनेत एकाच कुटुंबातील ७ जण बेपत्ता दोन वेगवेगळ्या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यात ११ वर्षांच्या दोन मुली तसेच एक महिला आणि तिच्या ४ मुलांचा समावेश होता. नालासोपारा पोलिसांनी कसलाही दुवा नसताना २५० हून अधिक सीसीटीव्हीच्या मदतीने या सर्वांचा शोध घेऊन त्यांना शोधून काढले.

फिर्यादी अनिल कदम (३६) हे पत्नी अर्चना ( २५) आणि ४ मुलांसह नालासोपारा पश्चिम येथील श्रीपस्थ कॉलनीत राहतात. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी मेव्हणीच्या लक्ष्मी आणि सोनी या ११ वर्षाच्या मुली राहण्यासाठी आल्या होत्या. २६ ऑगस्ट रोजी या दोघी मुली खाऊ आणण्यासाठी गेल्या त्या घरी परतल्याच नाही. अनिल कदम यांची पत्नी अर्चना कदम (२५) या दोन्ही भाच्या बेपत्ता झाल्याने चिंतेत होत्या. आता गावी बहिणीला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे २७ ऑगस्ट रोजी अर्चना या देखील आपल्या दोन भाच्यांना शोधण्यासाठी निघाल्या. सोबत त्यांची ४ मुले होते. त्यात सोनी (१०), रोशनी (७) दिपक (५) आणि अक्षय (३) या चौघांचा समावेश होता. मात्र त्या देखील घरी परतल्या नाहीत. या मुळे अनिल कदम यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आणखी वाचा-गणेशोत्सवाची खरेदी करून परताना दुचाकीचा अपघात, चांदीप येथील घटना ; बारा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

त्यांनी याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन दिवसात एकाच कुटुंबातील ७ जण बेपत्ता झाल्याने पोलीसही चक्रावले. तनालासोपारा पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार केले. अर्चना कदम यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता. त्यामुळे शोधणे कठीण होते. मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला. दोन दिवसांनी अर्चना कदम या नालासोपारा पूर्वेला आढळून आल्या. बेपत्ता भाच्यांना शोधण्यासाठी त्या गेल्या होत्या. परंतु त्या सापडत नसल्याने त्या देखील घरी आल्या नव्हत्या. दोन रात्री त्यांनी रेल्वे स्थानकात काढली होती.

२५० सीसीटीव्ही कॅमेर्‍याने घेतला शोध

कदम यांच्या पत्नी आणि ४ मुले सुखरूप होती आता पोलिसांनी ११ वर्षांच्या दोन लहानग्या मुलींची चिंता होती. बदलापूर येथील घटनेनंतर काही गैरप्रकार होण्याची शक्यता होता. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने कसून तपास केला. या मुली नालासोपारा स्थानकातून कांदिवली येथे गेल्या होत्या. तेथून चर्चगेटकडे आणि नंतर पुन्हा विरार स्थानकात आल्याचे सीसीटीव्हीतून समजले. त्या विरार वरून भरूच ट्रेन पकडून गुजरातला गेल्या. मात्र कुठे जायचे हे समजत नसल्याने पुन्हा मुंबईत आल्या.

आणखी वाचा-नालासोपार्‍याच्या नवीन रस्त्यावर भीषण अपघात; दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू

या काळात त्या एकामागून एक ट्रेन बदलत होत्या. त्या मूळ गावी जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कल्याण आदी ठिकाणी पथके तैनात केली होती. अखेर त्या दोघी ४ दिवसांनी कांदिवली स्थानकात सापडल्या. घरी कसे जायचे, पत्ता माहित नसल्याने त्या भटकत होत्या. दोन्ही मुली सुखरूप असून त्यांना बाल कल्याण समितीच्या निर्णयानंतर एका सामाजिक संस्थेच्या आश्रमात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोथमिरे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, अमोल तटकरे आदींच्या पथकाने या बेपत्ता कुटुंबातील ७ जणांचा शोध लावण्यात यश मिळवले.