वसईत रस्त्यालगत, तलाव, खाडीपात्रात घातक कचरा टाकण्याचे प्रकार

वसई: बिघडलेले टेलिव्हिजन संच, नादुरुस्त फ्रिज आणि संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू यातून निघणारा ई-कचरा हा सर्रासपणे तलाव व खाडीपात्रात फेकून दिला जात आहे. यामुळे ई कचऱ्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. विरार पूर्वेच्या आगाशी येथील भागातही मोठय़ा प्रमाणात हा कचरा टाकून दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

वसई-विरार शहरात आगाशी भाटी बंदर परिसरात पर्यावरणास घातक असा हजारो किलो  कचरा उघडय़ावर फेकून दिला आहे. या कचऱ्यात नादुरुस्त टीव्ही संचाच्या काचा, वॉशिंग मशीनमध्ये वापरण्यात येणारे फोम तसेच इतर अनावश्यक असा प्लास्टिक कचरा यांचा समावेश आहे. आजूबाजूच्या भागात असलेल्या भंगारविक्रेत्यांनी हा कचरा या भागात टाकून दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा सर्व कचरा खाडीच्या वाहत्या पात्रात तसेच तलावात फेकून दिला आहे. तलावात घातक कचरा टाकल्यामुळे त्याचा परिणाम हा कमल पुष्पांवरती होत आहे. तर दुसरीकडे काहीजण हे खाडीपात्रात मासेमारीसाठी जातात. मात्र खाडीपात्रात फेकून दिलेल्या टीव्ही संचाच्या काचा पायाला लागून दुखापत होण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत आहेत. तर मासेमारीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगाशी परिसरात मोठय़ा संख्येने भंगारविक्रेत्यांची वस्ती आहे.  या भागात अनधिकृत भंगार गोदामेही उभी राहू लागली आहेत. आगाशी परिसर, उंबर्गोठण, नवापूर, ज्योती, कोल्हापूर, चाळपेट, कोफराड,  टेंभी, पूरापाडा आदी परिसरांतून हे भंगारविक्रेते दररोज हजारो किलो भंगार या गोदामात आणतात, त्यानंतर त्यातून निवड करून जो काही अनावश्यक कचरा त्या परिसरात फेकून देतात.

अनेकदा हे भंगारविक्रेते केबल्स जाळून त्यातील तांब्याच्या तारा काढण्यासाठी आगी लावत असल्यामुळे येथे प्रदूषणही वाढत चालले आहे. यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. पर्यावरणास घातक अशा या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, तसेच भंगार विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कवळी यांनी केली आहे.

महामार्गावरही कचरा

वसईच्या भागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या भागातही मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. सातिवली, चिंचोटी, मालजीपाडा, वसई फाटा, अशा विविध ठिकाणच्या भागांत औद्योगिक व इतर टाकाऊ कचरा छुप्या मार्गाने आणून टाकला जात आहे. यावर कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. यावर महापालिकेने लक्ष देऊन छुप्या मार्गाने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

वसई-विरार शहरात ज्या  भागात कचरा टाकला जात आहे, त्या ठिकाणी संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना सूचना करून याची माहिती घेतली जाईल व त्यानुसार त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अजिंक्य बगाडे, उपायुक्त महापालिका घनकचरा विभाग