भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील दिव्यांग नागरिकांची योग्य माहिती मिळावी म्हणून सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.त्यानुसार शासकीय सुविधाचा लाभ देण्याचे धोरण ठरवले जाणार आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुवारी मिरा भाईंदर मधील दिव्यांग नागरिकांच्या विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी दिव्यांग नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.यामध्ये रस्त्यावरील स्टॉलवर पालिकेमार्फत होणारी कारवाई,नवीन परवाने मिळत नसल्याने होणारी धडफड,दिव्यांग योजनाची रखडपट्टी,इतर महापालिकेच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने आकारले जाणारे भुईभाडे, हक्काचे दिव्यांग भवन व घरकुल योजनेचा लाभ न मिळत नसल्याच्या तक्रारीचा यात समावेश होता.याशिवाय शहरातील दिव्यांग नागरिकांच्या संख्येबाबत कडू यांनी आक्षेप नोंदवला होता.
त्यावरून प्रशासकीय धोरणात आवश्यक सुधार करणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली.यामध्ये शहरातील दिव्यांग नागरिकांची माहिती जाणून घेण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.त्यामुळे शहरातील दिव्यांग नागरिकांची माहिती पुढे येईल व त्यानुसार त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यास मोठी मदत होणार आहे.
अकोला पॅटर्न सर्वेक्षण
अकोला शहरात दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.हे काम आशा वर्कर्स च्या मदतीने केले जात आहे. यामध्ये दिव्यांग नागरिकांची योग्य व अचूक माहिती मिळत असल्याची माहिती माजी मंत्री बच्चू कडू यांनी मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाला दिली. त्यावरून आकोला सर्वेक्षण पॅटर्नचा अभ्यास करून मिरा भाईंदर शहरात देखील सर्वेक्षण केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून बैठकीत सांगण्यात आले.