वसई : वसई विरार मधील पावसाळ्यात धबधबे, नद्या, समुद्र अशा विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी दरवर्षी विविध दुर्घटना समोर येत असतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी  पर्यटनस्थळांवर काही कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त यांनी हे आदेश जारी केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वसई तालुक्याचा परिसर निसर्गरम्य असा परिसर असून या भागात समुद्र किनारे, छोटेमोठे धबधबे आहेत. दरवर्षी मान्सूनला सुरुवात होताच मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी जात असतात. मात्र काही अतिहौशी पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे, स्टंट बाजी करणे, उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारणे, तर काहींना ठिकाणांची माहिती नसताना ही पाण्यात उतरतात त्यामुळे बुडण्याच्या घटना, प्रवाहात अडकून पडण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी परिमंडळ २ उपआयुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी नायगाव, वालीव व वसई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या पर्यटन स्थळी नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) (२)मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 

यात सुरुची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राम्हण पाडा हे समुद्र किनारे तर देवकुंडी कामण व चिंचोटी धबधबा, राजावळी खदान अशा ठिकाणच्या पर्यटनस्थळी बंदी घालण्यात आली आहे. २५ जून ते ८ जुलै पर्यंत ही पर्यटन बंदी लागू आहे. जे कोणी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पावसाळ्यात काही अतिहौशी पर्यटक पाण्याच्या ठिकाणी जात असतात अंदाज न आल्याने पर्यटक बुडण्याच्या घटना समोर येत अशा घटना होऊ नये यासाठी पर्यटन स्थळी शंभर मीटर परिघात बंदी घातली असल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदी अशा प्रकारे

  • पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही.
  • पावसामुळे वेगाने वाहनाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, त्या वाहत्या पाण्या खाली बसू नये
  • पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, थबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायकवळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करू नये
  • पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत मध्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करण्यावर बंदी आहे.

मागील वर्षी चिंचोटी धबधब्यावर एकही बळी नाही.

चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी जाणारी पायवाट अरुंद आहे. दगडांवर शेवाळ साचल्याने ते निसरडे होऊन खाली पडण्याची शक्यता असते. धबधब्याचा डोह खोल असून पाण्याचा प्रवाह असल्याने पट्टीचे पोहणारे देखील बुडत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन केले होते. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार गस्त ही ठेवली होती. त्यामुळे मागील वर्षी एकही दुर्घटना घडली नसल्याचे नायगाव पोलिसांनी सांगितले आहे.