वसई: नायगाव मध्ये पूर्ववैमन्यसातून एका इसमावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुणी जखमी झाले नाही. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.फिर्यादी वेणुगोपाल पोन्नम (३४) हा नायगाव पू्र्वेच्या जूचंद्र येथील गोपीकिसन संकुलात राहतो. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नायगाव पश्चिमेकडून दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. पूलावरून उतरून पुढे गेल्यावर काही अंतरावर त्याला दोन जणांनी अडवले. त्यांच्यात बाचाबाची झाली. काही अंतरावरून त्या दोघांनी फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली. मात्र खाली वाकल्याने वेणुगोपाल बचावला. हल्लेखोर त्यानंतर पळून गेले.

या घटनेनंतर वेणुगोपाल याने नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना एक रिकामी पुंगळी आढळळी. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लक्ष्मण पंचाला, पोचालू आकुला या दोघांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, २ (५) तसेच शस्त्र अधिनियमन १९५९ च्या कलम ३, ५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांनी मध्यरात्री नालासोपारा येथून अटक करण्यात आली.

आरोपी आणि फिर्यादी हे ताडी विक्रीच्या व्यवसायात आहे. त्यांचा वाद होता असे पोलिसांनी सांगितले. मात्र आम्ही गोळीबार केला नसल्याचा दावा आऱोपींनी केला. आम्ही फिर्यादीचा पाठलाग केला आणि आमच्यात बाचाबाची झाली. परंतु आम्ही गोळी झाडली नाही, असे आरोपींनी सांगितले. पोलीस या दाव्याची सत्यता तपासत आहेत.