मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वसई : मागील तीन चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा गुरुवारी सकाळपासूनच वसई विरार शहर आणि परिसरात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वसई विरार शहर पुन्हा जलमय झाले आहे. दिवसभरात १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचून अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. विविध भागात झाडे कोसळली होती तर वीजपुरवठा नेहमीप्रमाणे खंडित झाला होता.
आठवडाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी ओसरले नसतानाच गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. यामुळे वसई विरार मधील सखल भाग हे पूर्णत: पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये विरार पूर्व पश्चिम जोडणारा प्रमुख मार्ग विवा कॉलेज रस्ता, अर्नाळा — नाळे रस्ता पाण्याखाली गेला होता. दिवसभर सातत्याने पाऊस सुरूच असल्याने नालासोपारा येथील यात नालासोपारा पूर्वेतील तुळींज , संतोष भवन, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, निळेमोरे हा भाग पाण्याखाली गेले. अनेक इमारतींच्या तळमजल्यावर पाणी गेले. गुरूवारच्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा शहर आणि परिसराला विशाल जलाशयाचे स्वरूप आले होते. बैठय़ा चाळी असलेल्या परिसरात दूषीत पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. वसंत नगरी, एव्हरशाईन सिटी या भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले होते. अंबाडी रोड एव्हरशाईन सिटी येथील मुख्य रस्त्यावर पाणी भरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वसईतील माणिकपूर , सनसिटी गास रस्ता, नवघर पष्टिद्धr(१५५)म बंगली देवतलाव, वासळई सहजीवन, होळी रानगाव, तसेच वसई पूर्वेतील वालीव, वसई फाटा ,नायगाव पूर्वेतील स्टार सिटी यासह इतर ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. माणिकपूर पासून अंबाडी रोडला जोडणारा मुख्य रस्त्या पाण्याखाली गेला. होता. समतानगर, डीजी नगर, दिवाणमान, आनंद नगर या भागात पाणी साचले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडता आले नाही. तर वाहनचालकांना ही या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत काढताना चांगलीच कसरत करावी लागली. पश्चिम पट्टय़ातील अनेक गावात पाणी शिरले होते. रानगाव, मर्सेस, चुळणे, नंदाखाल, कोफराड या गावांमध्ये पाणी शिरले होते. यंदा प्रथमच पाणी गावात साचत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. वसई पूर्वेच्या पालिकेच्या कचराभूमीत पाणी शिरून तेथील दूषीप पाणी गोखिवरा, भोयदापाडा येथील रस्त्यावर आले होते.मुसळधार पावसामुळे संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन महसूल आणि पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
शेतकऱ्यांचे भात वाहून गेले
वसईच्या भागात पावसाळा सुरू झाल्याने भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांनी भाडय़ाने ट्रॅक्टर घेऊन शेत नांगरणी , बियाणे, खत औषधे खरेदी, मजूर घेऊन व त्या भाताला मोड आणून त्यांची पेरणी केली होती. मात्र गुरुवारी अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसात पेरणी केलेले भात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही कामे करण्यासाठी मागील काही दिवसांपासून मेहनत सुरू होती. सर्व केलेली मेहनत या जोराच्या पावसाने मातीमोल केली आहे. या कामासाठी केलेला खर्च ही वाया गेला असून पुन्हा पेरणी करावी लागणार असल्याचे शेतकरी विश्वनाथ कुडू यांनी सांगितले
आहे.