भाईंदर: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे मिरा भाईंदरच्या मीठ शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.यात मुख्य हंगामातील मिठाचे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी जवळपास ६६ टक्के इतके मीठ उत्पादन घटले असल्याचे मीठ उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.
मिरा – भाईंदर हे खाडी आणि समुद्र किनारी वसलेले शहर असल्यामुळे येथील जमिन ही खारपाण्याची आहे.गेल्या अनेक दशकापासून या शहरात मीठ शेती केली जात आहे.शिवाय येथून तयार होणाऱ्या मिठाला बाजारात देखील मोठी मागणी आहे.प्रामुख्याने या भागात कुपा, वजनी आणि कर्कज अशा तीन प्रकारचे मीठ तयार होते. यात कुपा मिठाचा वापर हा खाऊक बाजारात होतो.
वजनी मिठाचा वापर बर्फच्या कारखान्यात होतो.तर कर्कज मिठाचा वापर हा कापडी आणि रसायनिक कारखान्यात केला जातो.यामुळे मीठ उत्पादकास मोठा आर्थिक लाभ होत आला आहे.
साधारण नोव्हेंबर महिन्यापासून या मीठ शेतीला सुरुवात होते.यात मिठागराची उभारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे आणि मजूर उपलब्ध करण्यासारख्या कामाचा यात समावेश आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या शेतीत एकूण उत्पनाच्या जवळपास ३३ टक्के पर्यंत मीठ उत्पन्न होते.तर उन्हाळ्याची सुरुवात होताच १० जून पर्यंत मीठ शेती केली जाते. प्रामुख्याने मे महिना हा मीठ उत्पन्नासाठी मुख्य ठरत असून यात जवळपास ६६ टक्के उत्पन्न मिळते.
मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे मीठ शेतीचे नुकसान झाल्याची बाब दिसून आली होती. हा अवकाळी पाऊस गेल्यानंतर पुन्हा मीठ उत्पदान मिळण्याची आशा होती.परंतु सतत सुरु असलेल्या पावसामुळे आता मिठागरात पाणी साचले असून ऐन हंगामात मिठागर बंद करण्याची नामुष्टी उत्पादकांवर ओढवली आहे.
मोठे आर्थिक नुकसान
मीठ शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते.त्यामुळे हे काम करण्याची कला आदिवासी समाजातील मोजक्याच मजुरांमध्ये आहे.त्यामुळे हे मजूर नोव्हेंबर ते जुन अशा मीठ निर्मितीच्या काळात मीठ उत्पादकांकडेच वास्तव्याला असतात.गेल्या काही वर्षात हे काम शिकण्याकडे नव्या मजुरांनी पाठ फिरवली असल्यामुळे मिळणाऱ्या मजुरांना मागणी प्रमाणे वेतन द्यावे लागते. मात्र यंदा मीठ शेतीच करता आली नसल्यामुळे मुजराचे वेतन व इतर खर्च लाखो रुपयांच्या वर गेला असल्याचे मीठ उत्पादक प्रशांत शाह यांनी व्यक्त केली आहे.