|| धनराज खरटमल

बक्षीसपत्र अथवा दानपत्रासाठी दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजीच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम-१९५८ चे अनुसूची एकचे अनुच्छेद-३४ च्या परंतुका-५ प्रमाणे सुधारणा करून शासनाने मोठी सोय करून ठेवलेली होती. निवासी अथवा शेतजमिनीच्या मिळकतीचे बक्षीस अथवा दानपत्र करावयाचे असेल आणि जर ती मिळकत आई-वडील आपल्या मुलांना, आजी-आजोबा आपल्या नातवंडांना, पती आपल्या पत्नीला, पत्नी आपल्या पतीला, सासु-सासरे आपल्या विधवा सुनेला, अशी मिळकत जर बक्षीसपत्राव्दारे देत असतील, तर यापूर्वी फक्त रुपये दोनशे मुद्रांक शुल्क व फक्त दोनशे रुपये नोंदणी फी भरून मुंबईतल्या मिळकतीचे बक्षीसपत्र करून देता येत होते. त्यासाठी जादा मुद्रांक शुल्क अथवा नोंदणी फी भरण्याची आवश्यकता भासत नव्हती.

परंतु शासनाच्या नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ यांनी दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई महानगर पालिका अधिनियम (१८८८ चा ३) चे पोट-कलम १४४ चे पोट-कलम (१) च्या अधिकारानुसार, एक अधिसूचना काढून आता मुंबईतल्या बक्षीस देण्यात येणाऱ्या मिळकतीवर एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क लागू केलेले आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या निवासी अथवा शेतीच्या मिळकतीचे बक्षीसपत्र फक्त रुपये दोनशेच्या मुद्रांक शुल्कावर होणार नाही.

खरे तर यापूर्वी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात बक्षीसपत्रावर जिल्हा परिषद सेस अथवा एलबीटी म्हणून बाजारमूल्याच्या एक टक्का अधिक रक्कम रुपये दोनशे इतके मुद्रांक शुल्क आकारले जात होते. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे निवासी व शेतजमिनीच्या बक्षीसपत्रावर आता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तथापि, नोंदणी फीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नसून, अशा रक्ताच्या नात्यात दिलेल्या बक्षीसपत्राला नोंदणी फी पूर्वीप्रमाणे रक्कम रुपये दोनशे इतकीच आहे.

शासनाने दिलेल्या या मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा अनेकांनी घेतला. परंतु बऱ्याच वेळा अशी परिस्थिती असते की, आई-वडील आपल्या मुलाला, मुलीला, आजी-आजोबा आपल्या नातूला, नातीला बक्षीस दिलेला फ्लॅट हा बऱ्याच वेळा त्यांचा राहता फ्लॅट असतो. म्हातारपणात एकटे असलेल्या मातापित्यांनी आपला मुलगा, मुलगी, म्हातारपणी आपल्याला सांभाळेल किंवा आजी-आजोबा आपले नात, नातू आपल्याला म्हातारपणात सांभाळतील व आपली काळजी घेतील या उद्देशाने बक्षीसपत्र करून दिलेले असते.

असे बक्षीसपत्र करून दिल्यानंतर काही कालावधी निघून जातो. घराच्या किल्ल्या हाती लागल्यावर काही मुले किंवा नातवंडे आपले अनोखे रंग दाखवू लागतात. तेव्हा मात्र वार्धक्याच्या स्थितीत असलेले माता-पिता, आजी-आजोबा काहीही करू शकत नाहीत. मग त्यांना मारहाण करणे, टोचून बोलणे, शिव्या देणे, प्रसंगी घरातून हाकलून देणे असेही प्रकार आपण समाजात पाहिलेले आहेत. इतकेच कशाला, दक्षिण मुंबईसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील एका उच्चशिक्षित मुलाने आईच्या नावावर असलेली मिळकत आपल्या नावे व्हावी म्हणून आपल्या आईला कारमधून दूरवर नेवून ढकलून देवून तिला टाकून देण्याची घटनाही अद्याप आपल्या विस्मृतीतून गेलेली नाही.

मी सहदुय्यम निबंधक म्हणून मुंबईतच काम करत असताना एका व्यक्तीचे बक्षीसपत्र नोंदवून दिलेले होते. आता सुमारे तीन वर्षांनंतर त्या व्यक्तीचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘‘साहेब तुम्ही वरळीला असताना माझे बक्षीपत्र नोंदवून दिलेले होते. माझी पत्नी हयात होती तोपर्यंत सारे काही ठीक चालले होते. आता मात्र मी एकटा आहे. मुलगा मला घरातून निघून जाण्यास सांगतो. किंवा म्हणतो, पाहिजेतर तुम्ही तुमचा फ्लॅट परत तुमच्या नावे बक्षीसपत्राने करून घ्या. आता मी काय करू सांगा? कारण आता पुन्हा मी स्टॅम्पडय़ुटीचा खर्च करू शकत नाही.’’

मग मी त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. आज रोजी त्या गृहस्थांना जर का पुन्हा स्वत:च्या नावे तो फ्लॅट करून घ्यायचा असेल तर बाजारमूल्यावर मुद्रांक शुल्क तीन टक्के व नोंदणी फी एक टक्का दराने भरणे आवश्यक आहे. कारण आता नेमकी उलटी परिस्थिती असल्याने व तो फ्लॅट आता मुलाकडून वडिलांना बक्षीस मिळणार असल्या कारणाने (पूर्वी जरी वडिलांनी मुलाला फ्लॅटचे बक्षीसपत्र रक्कम रुपये दोनशेच्या मुद्रांक शुल्कावर करून दिलेले असले तरी ) आता परिस्थिती उलट आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत मुलगा तो फ्लॅट जर का वडिलांना बक्षीसपत्राने देत असेल तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८चे अनुसूची एकचे अनुच्छेद ३४ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यावर मुद्रांक शुल्क देय ठरते.

आजच्या परिस्थितीत मुंबईच्या कोणत्याही भागातल्या फ्लॅटचे मूल्यांकन कोटीच्या खाली येत नाही. त्यामुळे त्यावर देय असणारे मुद्रांक शुल्क लाखोच्या घरात येते. वरील उदाहरणात मुलाने वडिलांसमोर ठेवलेला प्रस्ताव वडील आजमितीला स्वीकारू शकत नाहीत. कारण बाजारमूल्य दराच्या तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क व एक टक्का नोंदणी फी भरणे आजरोजी वडिलांच्या आवाक्यात नाही. त्यामुळे अशा अपवादात्मक प्रसंगी आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी बक्षीसपत्राव्दारे मुलाला, मुलीला, नातवाला, नातीला, दिलेला फ्लॅट जर पुन्हा आई-वडिलांना किंवा आजोबा-आजीला बक्षीसपत्रानेच देत असेल तर अशा प्रसंगी रक्कम रुपये दोनशे मुद्रांक शुल्क भरून घेवून बक्षीसपत्र करून घेतल्यास; ज्या आई-वडिलांना आजी-आजोबांना असा त्रास होतो आहे ते सहजपणे सदरची मिळकत पुन्हा आपल्या नावे करून घेऊ शकतील. पुढील जीवनात त्यांना रस्त्यावर येण्याची पाळी येणार नाही. त्यामुळे वृद्ध मातापित्यांना निश्चितच दिलासा मिळेल. शासनाने अशा प्रकारच्या काही अपवादात्मक परिस्थितीत- वर नमूद केल्याप्रमाणे (उलट बक्षीसपत्राच्या प्रकरणी) मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी.

निवृत्त सहदुय्यम निबंधक, मुंबई शहर.

dhanrajkharatmal@yahoo.com