|| उमेश पवार गेल्या पाच वर्षांत पुण्याची झालेली वाढ ही स्वप्नवत आहे. दोन रिंग रोड्स, १०० किमीचे मेट्रोचे जाळे, तीन विमानतळ लोहगाव, प्रस्तावित नवी मुंबई आणि पुरंदर या सर्वाच्या विकासाची कामे सध्या सुरू आहेत. स्वच्छ पाणी, मोकळी हवा, बारामाही सुस वातावरण यांचे नैसर्गिक वरदान पुण्याला लाभलेले आहे. विद्येचे माहेरघर म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याला सातत्याने रोजगार आणि शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणाईचेदेखील वरदान आहे. संपूर्ण देशामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले आय.टी. पार्क पुण्यात आहे. मेडिकल टुरिझम, औद्योगिक क्षेत्र यांची वाढ होत आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर हे शहर आहे. यांमुळे पुणे शहराची वाढ घोडदौड करत आहे. गुंतवणुकीसाठी रियल इस्टेट हे सर्वात सुरक्षित क्षेत्र असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असून, येत्या काळात पुण्यात राहणाऱ्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना याचा निश्चितच अजून फायदा होणार आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे सूत्र आपल्याला सर्वाना आधीपासून माहिती होतं, मात्र या करोना महामारीच्या काळामध्ये आपल्या सगळय़ांनाच त्याची जाणीवदेखील झाली, ज्याप्रमाणे आरोग्य हे आपल्या सगळय़ांच्याच आयुष्यात प्रथम क्रमांकावर असायला हवे तसे दुसरा क्रम मी निवारा याला देईन. परंतु फक्त निवारा असे न म्हणता, स्वत:चे हक्काचे राहते घर याला प्राधान्य द्यायला हवे. कारण हक्काचे घर हीच जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे हे आता आपल्या सर्वाच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे जिथे आपल्या जीवनात आमलाग्र बदल घडले किंवा घडत आहेत, त्यामध्ये वर्क फ्रॉम होम कल्चर, डिजिटलायझेशन प्रामुख्याने समोर येतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरांमध्ये एक स्वतंत्र खोली असायची, जिचा वापर सर्वसाधारणपणे कोणत्याही कारणासाठी केला जात होता. आता आपल्याला प्रत्येकालाच अशा स्वतंत्र खोलीची गरज पडत आहे, त्यामुळे अलीकडच्या दोन वर्षांच्या काळामध्ये तीन, चार आणि पाच बीएचकेची गरज अचानक वाढली आहे. २०१९ ते २०२१ सालच्या दरम्यान मोठं घर असण्याच्या प्रमाणात पुण्यात ८८ टक्के वाढ झाली आहे. आणि ही मागणी २०२५ पर्यंत अशीच राहणार आहे. त्यामुळे इतर बांधकाम व्यावसायिकांनी तीन, चार आणि पाच बीएचके फ्लॅट किंवा बंगल्यांच्या निर्मितीकडे जास्त लक्ष केंद्रित करायला हरकत नाही. पुणे, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद इत्यादी शहरांमध्ये ही निवासी घरांची मागणी अशीच राहू शकते. करण या चारही प्रमुख शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात आधारभूत संरचनेचा विकास होत आहे, शहराच्या हद्दीही वाढत आहेत, स्थलांतरित होण्याची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पुणे हे भारतातले दुसऱ्या दर्जाचे सर्वात मोठे शहर म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. गुंतवणूक म्हणून किंवा स्वत:ला राहण्यासाठी म्हणून पुणे शहराकडे सगळय़ांचे लक्ष आहे. मग त्यात वीकेंड होम किंवा निवृत्तीनंतर राहण्यासाठी शांत आणि निवांत अशी परिसर असलेली मालमत्ता घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. या चारही कारणांपैकी कोणत्याही कारणास्तव तुम्ही पुण्यात घर घेण्याचा विचार करू शकता. भारतातील सर्वाधिक वेगाने वाढ होणाऱ्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. पुण्याची घर उभारणीत गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत आहे. आर्थिक वाढीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने रिंग रोड विकसित करण्याचे ठरवले आहे. त्याचे बांधकाम पूर्ण होणे, हे पुण्यातील व्यावसायिक रिअल इस्टेट मार्केटसाठी एक वरदानच ठरणार आहे. सध्या बांधकाम सुरू असलेला पुणे मेट्रो प्रकल्प हा केवळ रिअल इस्टेटच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल. मात्र शहराच्या राहणीमानाचा निर्देशांक आणि राहणीमानाची प्रत वाढवेल आणि त्याचसोबत शहरातील असंख्य लोकांसाठी तो एक किफायती आणि सोयीचा दळणवळणाचा मार्ग ठरेल. या सोबतच पुण्याला तीन एअरपोर्टचे वरदान लाभलेले आहे. ज्यातील एक आत्ताच अस्तित्वात आहे आणि उर्वरित दोन अनुक्रमे नवी मुंबई आणि पुरंदर येथे बांधले जाणार आहेत. या सोयींमुळे पुण्यातील व्यापाराला अधिक चालना मिळेल व व्यवसाय वृद्धिंगत व्हायला मदत होणार आहे. त्याचसोबत चांदणी चौकातील मल्टी-फ्लायओव्हर आणि सहा पदरी महामार्गाचे बांधकाम पुण्यासाठी आणि पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. १५-२० वर्षांपूर्वी पुण्यात कुठल्याही अभ्यास वा अंदाजाशिवाय केवळ गुंतवणूक म्हणून पुण्यात काही लोकांनी जी जागा घेतली, त्यांची किंमत आता दुप्पट, तिप्पटच नव्हे तर काहींची चौपट झालेली आहे. कोथरूड या भागाची वल्र्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लवकर विकसित झालेला भाग म्हणून नोंदणी झालेली आहे. शेतजमीन, अथवा मोकळय़ा जागा गुंतवणूक म्हणून विकत घेणे आज तेवढे फायद्याचे नाही. या प्रकारच्या जागांमध्ये गुंतवणूक करण्यात मोठी जोखीम असते आणि त्याचे दर तितकेसे काही वाढतही नाहीत. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शहराचा अभ्यास असण्याची अनिवार्य गरज आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्याची झालेली वाढ ही स्वप्नवत आहे. दोन रिंग रोड्स, १०० किमीचे मेट्रोचे जाळे, तीन विमानतळ लोहगाव, प्रस्तावित नवी मुंबई आणि पुरंदर या सर्वाच्या विकासाची कामे सध्या सुरू आहेत. स्वच्छ पाणी, मोकळी हवा, बारामाही सुस वातावरण यांचे नैसर्गिक वरदान पुण्याला लाभलेले आहे. विद्येचे माहेरघर म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याला सातत्याने रोजगार आणि शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणाईचेदेखील वरदान आहे. संपूर्ण देशामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले आय.टी. पार्क पुण्यात आहे. मेडिकल टुरिझम, औद्योगिक क्षेत्र यांची वाढ होत आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर हे शहर आहे. यांमुळे पुणे शहराची वाढ घोडदौड करत आहे. गुंतवणुकीसाठी रियल इस्टेट हे सर्वात सुरक्षित क्षेत्र असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असून, येत्या काळात पुण्यात राहणाऱ्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना याचा निश्चितच अजून फायदा होणार आहे. पुण्यामध्ये पुणे (पूर्व) आणि पुणे (पश्चिम) हे भाग वेगाने विकसित होत आहेत. चांदणी चौक हा नाईन मल्टिप्लायर होणार आहे. मागील पाच वर्षांत पुण्यामध्ये ५० पेक्षा जास्त गावे शहर मर्यादेमध्ये सलंग्न झाली आहेत. चायनीज तत्त्वज्ञानाप्रमाणे असं म्हटलं जातं की घर, घेण्यासाठीची गुंतवणूक अशा ठिकाणी करा जिथे शहराची हद्द संपते. त्यामुळे माझ्या मते तुम्ही स्वत:चे हक्काचे घर पुण्यात घेणार असल्यास खालील ठिकाणचा विचार करायला हरकत नाही. पश्चिम - पुणे - बावधन, भूगाव, बाणेर, बालेवाडी हिंजवडी, वाकड, रावेत, गहंजे. दक्षिण - पुणे - एन-आय- बी -एम, उंड्री, गंगाधाम, कात्रज. पूर्व -पुणे - विमाननगर, न्यू कल्याणीनगर, मुंढवा, हडपसर, मांजरी. दक्षिण - पुणे - धानोरी. पुणे सेंट्रल : कर्वे रोड, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी, कोथरूड , कोरेगाव पार्क. लॉकडाऊनच्या काळात रिअल इस्टेटच्या निवासी क्षेत्रात मोठी वाढ दिसून आली. खूप लोकांनी ठरवलं की, त्यांना जर या करोना महामारी कालावधीमध्ये घरातच अडकून पडायचे आहे, तर त्यांना अधिक मोठय़ा आणि घरातून चालणाऱ्या ऑफिस तसेच शाळेसाठी अधिक व्यवस्थित जागेची गरज आहे. वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा ऑफिसेस बंद झाली आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची सोय च राहिली नाही तेव्हा अनेक लोकांनी उपनगरात घरे घेतली आणि ऑनलाइन काम सुरू केले. करोनाकाळानंतर शहरी भागातील निवासी मालमत्तांचे भाडय़ाचे दर पुन्हा एकदा स्थिरावले आहेत. याचा अर्थ यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पुण्यात सध्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या दारात मिळणारी घरांची संख्या भरपूर आहे, ज्यामुळे आत्ताचा काळ हा पुण्यात नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी उत्तम असेल. नवीन प्रकल्प विकसित करण्याचे प्रमाण सध्या जरी कमी दिसून येत असले, तरी विकासक विक्री आणि उत्तम दर्जाचे बांधकाम करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. निवासी मालमत्ता बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. अनलॉक केल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने स्टँप डय़ुटीमध्ये कपात केली. बाजारात हालचाल सुरू करण्यासाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरला. त्याशिवाय निवासी मालमत्तेची मागणी वाढण्यामागे वर्क फ्रॉम होम हे दुसरे महत्त्वाचे कारण ठरले. कमी मॉर्गेज रेट्स आणि डेव्हलपर्स देऊ करत असलेले विविध पर्याय.. यामुळे २०२० नंतर निवसी मालमत्तेच्या बाजारपेठकडे वेगाने वाढ होत असलेली दिसून येत आहे. करोनाकाळामध्ये सगळय़ा व्यक्तींना, कुटुंबांना वाटू लागले, की आपण आत्ता राहतो त्यापेक्षा मोठय़ा घरात राहायला जायला हवे. जे लोक आधी भाडय़ाच्या घरात राहत होते ते आता सगळय़ात मोठे स्टेक होल्डर बनून मोठे खरेदीदार बनले आहेत. मोठी अपार्टमेंट, व्हिला, बंगले, प्लॉट्स, लक्झरी फ्लॅट यांना सध्या भरपूर मागणी आहे. पुणे, अहमदाबाद, बंगलोर, हैद्राबाद यांसारख्या शहरांत जिथे स्थलांतरितांची संख्या जास्त आहे, मूलभूत सोयीसुविधा आहेत आणि अजून त्यात विकासकामांची भर पडते आहे अशा ठिकाणी ही मागणी भविष्यातही कायम राहील. पुण्यात वास्तव्य करू पाहणाऱ्या तरुण लोकसंख्येची उत्तम वस्तूंवर खर्च करण्याची ताकद जास्त असल्याने येत्या काही वर्षांत पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट भरभराटीला येणार आहे. (लेखक स्थावर मालमत्ता सल्लागार आहेत.) vasturang@expressindia.com