डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com

नि  वारा ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी

Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी
4 naxalites killed in Gadchiroli police achieve great success in the wake of Lok Sabha elections
गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश

एक. जसे अन्न महत्त्वाचे, तसेच महत्त्वाचे

डोक्यावरले छप्पर. मग तो माणूस सुधारणेच्या सर्वात वरल्या पायरीवर असो की सगळ्यात खालच्या. हा नियम अगदी जागतिक म्हणायचा. जिथे जिथे माणूस मुक्कामाच्या हेतूने उभा राहिला तिथे तिथे त्यानं स्वत:भोवती चार भिंती उभ्या केल्या अन् माथ्यावर छप्पर घेतलं. किंबहुना हे दुर्गाचं मूळ रूप होतं. स्वत:चं संरक्षण करायच्या उपजत भावनेला मानवानं दिलेला तो प्रतिसाद होता. कालांतराने परिमाणं बदलली. संरक्षणाच्या गरजा अन् व्याख्या बदलल्या. चार भिंतींचा दुर्ग आता कल्पनेच्याही पलीकडे विस्तारला. वैयक्तिक गरजा आता सामाजिक झाल्या.

मात्र वैयक्तिक मूलभूत गरजांचा नियम तसाच राहिला. सभोवतालच्या परिसराचं, त्या परिसरातल्या प्रजेचं संरक्षण करायची जबाबदारी दुर्गाची होती, तरी त्या दुर्गात जिथे माणसे राहणार तिथे त्यांना राहायला ठाव हवेत. मग ज्याच्यात्याच्या योग्यतेनुसार अन् सर्वसाधारण गरजेनुसार घरे बांधली जाऊ लागली. कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून ते सर्वच  प्राचीन साहित्यांमधून दुर्गावरील वास्तूंची वर्णने दिली आहेत. कोणती वास्तू कुठे असायला हवी, कोणत्या दिशेला हवी, राजानं कुठं राहायचं, सेनापती कुठं, मंत्रिगण कुठं, व्यापारी कुठं, सन्य कुठं राहायचं हे सारं सारंच दुर्गाच्या रचना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. मध्ययुगाच्या शेवटच्या कालखंडात दुर्गाच्या दणदणीत पायावर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. त्या दुर्गाची प्रेरणा काय होती हे रामचंद्रपंत अमात्यांनी ‘आज्ञापत्रा’त नेमक्या आणि नेटक्या शब्दांत सांगितलं. दुर्गाच्या विविध पलूंची वर्णने करताना, अतिशय महत्त्वाच्या अशा दारूकोठारांविषयी त्यांनी केलेले लिखाण अतिशय मननीय असेच आहे.

सुरुवात करतानाच पंत म्हणतात : ‘दारूखाना घराजवळ घराचे परिघाखाली नसावा..’ सुरक्षितता प्रमाण मानूनच या विषयाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यांचं पुढचं विवेचन वाचण्यासारखं आहे.

राजवाडय़ाखेरीज अथवा राजवाडय़ाच्या खालोखाल दुर्गावरली अत्यधिक महत्त्वाची इमारत म्हणजे दारूगोळ्याचे कोठार.  दुर्गाच्या आकारमानानुसार आणि महत्त्वानुसार ही कोठारे एक वा अनेक असत. दारूखाना वा बारूदखाना हेसुद्धा त्याचे एक नाव. अठरा कारखान्यांमधले हे एक अतिशय महत्त्वाचे खाते मानले जाई. दुर्ग हे राज्यरक्षणाचे, राज्याभिवृद्धीचे एक प्रमुख साधन होते. शिवछत्रपतींचे राज्य दुर्गकेंद्रित होते. अन् अशा दुर्गाचे सारे सामर्थ्य या दारूखान्यावर प्रामुख्याने अवलंबून होते. येथल्या अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात कसूर केली वा दारूगोळ्याचा तुटपुंजा साठा युद्धप्रसंगी दुर्गावर राहिला तर मग त्या दुर्गाचे स्वातंत्र्य धोक्यात आले असे निश्चित मानले जाई. यासाठी  मग या कारखान्यासाठी काही नियम केलेले होते अन् ते कसोशीने पाळले जावेत, यासाठी तशा सूचनाही होत्या.

या दारूखान्याची इमारत कधीही राहत्या घरांच्या जवळपास नसे. या इमारती बहुधा गडाच्या एखाद्या कोपऱ्यात असत. कुंपण म्हणून त्या गडाभोवती गर्द झाडी असे. कारण दुर्दैवाने अपघात झालाच तर त्यामुळे होणारी प्राणहानी अथवा वित्तहानी टळावी हा यामागचा हेतू होता. अर्थातच ज्या दुर्गावर मोकळी जागा असे, तिथेच हे शक्य होई; अन्यथा मग जी उपलब्ध जागा असे, त्यातच दारूखान्याची सोय करून मग सुरक्षिततेच्या उपायांची अगदी काटेकोर अंमलबजावणी बहुधा होत असावी.

दारूखान्याचे बांधकाम करताना त्यास तळघर करीत. त्या तळघराची जमीन चुनेगच्ची असे. त्यात कुठूनही पाणी पाझरणार नाही याची काळजी घेतली जाई.  कारण पाण्याने वा बाष्पाने दारू सादळली की त्याची माती झाली. मग तो दारूगोळा अगदी फेकून देण्याजोगा होई. म्हणूनच हा नियम. किंबहुना ज्वलनशील वा बाष्प धारण करणाऱ्या लाकडाचा समावेशही दारूखान्याच्या बांधकामात केला जात नसे. या तळघरात मांडणी तयार करून त्यावर दारूने भरलेले रांजण, माठ वा गाठोडी ठेवली जात. तोफांचे पोकळ गोळे- ज्यांत दारू व रेजगारी भरलेली असे, ते वरच्या भागात ठेवलेले- जळापासून सुरक्षित ठेवलेले असत. हे सारेच सामान अतिशय योजनापूर्वक मांडलेले वा साठवलेले असे.

दर आठ दिवसांनी दुर्गाचा हवालदार म्हणजेच प्रशासकीय अधिकारी या दारूकोठारातील दारू, बाण, होके, तोफगोळे, बंदुकीच्या गोळ्या, रेजगारी हे सर्व सामान, त्याच्या स्वत:च्या निगराणीखाली बाहेर काढे. ते दिवसभर उन्हात ठेवून, खणखणीत तापवून, ते जसे होते तसे पुन्हा भरून ठेवले जाई. मोठय़ा रांजणातल्या दारूसाठी रांजणाचे तोंड मातीच्या पसरट वाडग्याने झाकून गरम पाण्यात वितळवलेल्या मेणाने ते बंद करून त्यास बाष्पाचाही स्पर्श होणार नाही याची अगदी पुरेपूर काळजी घेतली जाई. हे सारे पुन्हा दारूकोठारात ठेवले जाई अन् मग तो हवालदार या कोठारास कुलूप लावून त्यावर आपली मुद्रा करीत असे. हे कोठार उघडण्याची वेळ आलीच तर त्यासाठी हवालदाराची उपस्थिती अनिवार्य असे. त्याच्या उपस्थितीविना ती मुद्रा तोडली जात नसे. यास अपवाद कदाचित केवळ युद्धप्रसंगाचा असावा. कदाचित अशा काळात हा अधिकार एखाद्या दुय्यम अधिकाऱ्याकडे दिला जात असावा. मात्र हा माझा तर्क आहे. याला लिखित प्रमाण नाही.

या कोठारांच्या रक्षणासाठी अष्टौप्रहर लष्कर तनात असे. त्या रक्षकांनी डोळ्यांत तेल घालून या कोठारांचे रक्षण करावे, असा धारा होता. योग्य परवानगीशिवाय अगदी कुणासही दारूकोठारांच्या परिसरात फिरकण्यासही मनाई होती. ही झाली काही हुद्दा असलेल्यांची कथा. तर सर्वसामान्यांची सावलीसुद्धा इथे पडू देत नसत!

तत्कालीन युद्धशास्त्राच्या पद्धतीनुसार तोफा, बंदुका, धनुष्यबाण, ढाली, तलवारी, गोफणगुंडे ही प्रमुख शस्त्रे असत. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर शंभूछत्रपतींनी रायगडाचा कारभार हाती घेतला. जामदारखाना अन् शिलेखाना या दोन्ही विभागांतील वस्तूंची यादी त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली बनवली. यात नऊ कोटी रुपये किमतीची चांदीची नाणी, ५१ हजार तोळे सोने, २०० तोळे माणके, १ हजार तोळे मोती, ५०० तोळे हिरे याची गणती झाली.  तर जदुनाथ सरकार म्हणतात : ९ खंडी सोने, ५ लक्ष होन, ३ खंडी तांबे, शिसे ४५० खंडी, २० खंडी लोखंड, ४०० खंडी जस्त व शिसे यांचा मिश्र धातू, ६ खंडी चांदी, २७२ खंडी कांसे (ब्राँझ), इतर दुर्गावर ३० लक्ष होन, १७,००० खंडी भात, ७०,००० खंडी तेल, २७० खंडी सैंधव, २०० खंडी जिरे, २०० खंडी गोपीचंदन, २०० खंडी गंधक अन् इतर अगणित मसाल्याचे व सुगंधी पदार्थ होते. वेिरगच्या ‘मराठाज्’  या ग्रंथाच्या आधारे गॅझेटिअरकार लिहितात : या वेळी रायगडावर कापडाची चार हजार पांढरी ठाणे, तीन हजार हलक्या किमतीच्या कापडाचे कपडे, एक हजार ठाण बऱ्हाणपुरी कापड, चार हजार तागे पठणी, एक लक्ष तागे हलके कापड गडावर होते. अन्नधान्य प्रचंड प्रमाणात होते.  याच्या पुढचा उल्लेख आपल्या प्रबंधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. वेिरग म्हणतो, गडाच्या शस्त्रागारात ४०,००० आखूड तलवारी, ३०,००० साध्या तलवारी, ६०,००० लांब तलवारी, ५०,००० दुधारी तलवारी, ४०,००० भाले, ६०,००० ढाली, ४०,००० धनुष्ये, १,८०,००० बाण, इ. युद्धसाधने होती. या लिखाणात तोफा-बंदुकांचा वा त्यासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याचा उल्लेख नाही. मात्र वरील आकडेवारी पाहून त्याची साधारण कल्पना नक्कीच करता येईल!

नारायणराव पेशव्यांच्या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी विठ्ठल यशवंत पोतनीस या शाहूच्या कारभाऱ्याच्या ताब्यातील रायगड जिंकून घेण्यासाठी मोहीम आखली. त्या मोहिमेसाठी सर्व साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. सोनारांना शिसे पुरवून त्यांच्याकडून बंदुकीच्या गोळ्या तयार करून घेतल्या. त्यांनी ५०,००० गोळ्या तयार करून दिल्या. या वेळी त्या चढाईस प्रत्युत्तर देण्यासाठी रायगडकऱ्यांनीही जय्यत तयारी केली. या वेळी रायगडावर ४६ तोफा, ३२ बंदुका, ३२ जेजाला, ३ जंबुरे, ३०,१४९ बंदुकीच्या गोळ्या, ३०१८ तोफांचे लहान गोळे, ७०९ जंगी गोळे, दारूची ११ पिंपे एवढा सरंजाम होता. हे आकडे युद्ध संपल्यावर पेशव्यांनी गड ताब्यात घेतल्यानंतरचे आहेत. ही एवढी व्यवस्था इ. स. १७७३ सालची आहे. पेशव्यांच्या ऱ्हासाच्या सुरुवातीच्या काळात, तीही एका कारभाऱ्याच्या ताब्यात रायगड असताना जर एवढी व्यवस्था होती, तर शिवछत्रपतींसारख्या दूरदर्शी अन् धोरणी राजाच्या राजधानीच्या दुर्गाची व्यवस्था कशी  असली पाहिजे, याविषयीचे केवळ तर्कच करणे आपल्या हाती उरते!

झुल्फिकारखानाने इ. स. १६८९ मध्ये रायगड ताब्यात घेतला अन् नंतरच्या आगडोंबात रायगडावरला दप्तरखाना जळून खाक झाला. त्यामुळे मराठी साम्राज्याच्या सुरुवातीच्या कालखंडातील सारा लिखित इतिहासच बहुधा जळून नष्ट झाला. त्यामुळे केवळ रायगडच नव्हे तर पहिली राजधानी राजगडासंबंधीचा याबाबतचा इतिहासदेखील अज्ञाताच्या पडद्याआड गेला आहे.

राजगडाच्या संदर्भात बोलायचे झाले, तर हे असे या पद्धतीचे विवेचन पेशवे दप्तरात वा अप्रकाशित कागदपत्रांमध्येसुद्धा आढळत नाही. या कागदपत्रांमध्ये राजगडाचे उल्लेख आहेत, मात्र ते प्रशासकीय कामकाजासंबंधीचे आहेत. कारण राजधानी म्हणून राजगडाचे असलेले महत्त्व नष्ट झाल्यावर त्याचे लष्करी अन् राजकीय अस्तित्वही हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली होती. ही कागदपत्रे आज सुरक्षित असती तर सुरुवातीचा शिवकालीन इतिहास सोन्यासारखा झळाळून उठला असता, हे निर्वविाद सत्य आहे!

अशा सुसज्ज दुर्गाच्या रक्षणासाठी मग सुसज्ज, लढवय्या सनिकांची नेमणूक केली जाई. कारण युद्धे शेवटी सैनिकच लढतात आणि जिंकून देतात. त्यांच्याविना एकटा दुर्ग शत्रूस प्रतिकार करूच शकणार नाही. म्हणून तटाबुरुजांच्या संरक्षणासाठी जे सैनिक असत, ते बहुधा बंदूकधारीच असत. तटसरनौबत, बारगीर, सदरसरनौबत, हवालदार या सर्वास तोफाबंदुका उत्तम तऱ्हेने चालवण्याचे ज्ञान असणे अत्यावश्यक असे. लढाऊ सनिकांनी तलवारी, भाले, धनुष्यबाण ही हत्यारे चालवणेसुद्धा आवश्यक असे. पंचहत्यारी असा एक शब्द शिवकालीन साहित्यात सापडतो. पंचहत्यारी पावक म्हणजे पाच हत्यारे बाळगणारा पायदळाचा किंवा घोडदळाचा सैनिक. ढाल-तलवार, भाला, तीर-कमान अन् बंदूक अशी बहुधा पाच हत्यारे नोंदलेली आढळतात. हत्यारे कदाचित बदलतही असतील. तीर-कमानीऐवजी पट्टा असेल. बंदुकीऐवजी विटा असेल. गुर्ज असेल वा फरी-गदगा असेल. मात्र ही हत्यारे वागवणारा सैनिक ती हत्यारे चालविण्यात पारंगत असला पाहिजे हे गरजेचं होतं. त्या पावकासाठीही अर्थात ती अभिमानाची गोष्ट होती.

दुर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने कमकुवत अशा जागी असलेल्या बुरुजांवर व तटाच्या बांधकामात अगोदरच योजून ठेवलेल्या मोक्याच्या जागी मारा करू शकणाऱ्या तोफा मांडून ठेवत. तोफा व त्या ज्यावर रचलेल्या असत, त्या गाडय़ांना भक्कम लोखंडी टेकू देऊन त्या हलू न शकतील अशा रीतीने ठेवत. तोफांच्या माऱ्यासाठी लागणारे सारे साहित्य- दारूची गाठोडी, तोफा ठासायचे गज, तापलेली तोफ थंड करण्यासाठी घालायच्या खोळी, तोफ ठासताना वापरण्यात येणारे जळके लोखंड, ठासण गच्च होण्यासाठी लागणारा ताग व काथ्या, अवजड पदार्थ सरकवण्यासाठी लागणाऱ्या तरफा, तोफाबंदुकींचे काने अथवा वात ओवायची छिद्रे स्वच्छ करण्यासाठी लागणारी हत्यारे, तोफेला वा बंदुकांना बत्ती देण्यासाठी लागणारे काकडे.. हे सारेच तोफाबंदुकांजवळ उपलब्ध असेल याची पूर्णत: काळजी घेतली जाई. हे साहित्य एकमेकांत मिसळू दिले जात नसे. याच्याच सोबतीला बाण, होके, रेजगारी, गोफणीसाठी नदीतले लहानमोठे गोटे या वस्तूही तटबंदीवर पहारा करत असलेल्या सनिकांपाशी सदैव सिद्ध असत, मग युद्धप्रसंग असो वा नसो.

शत्रू मुलखात आहे, मात्र तो लांबवर आहे, तो जेव्हा जवळ येईल तेव्हा पाहू, मग तयारी करू असे म्हणणारा मामलेदार नालायक समजला जाई. त्याला त्या कामावरून तात्काळ दूर केले जाई. झालेल्या राजाज्ञेचे चुकारपणा न करता निमूटपणे अन् त्याविषयी संशय न घेता पालन करावे; त्यामुळे पश्चात्ताप करायची पाळी येत नाही अन् मग त्यामुळे नेमून दिलेला धाराही कोणताही बाध न येता अव्याहत सुरू राहतो, असा यामागचा नेमस्त विचार होता.

शिवछत्रपतींचे सारेच दुर्ग, जलदुर्गाचा अपवाद सोडला तर गिरिदुर्ग या प्रकारात मोडणारे. सह्यद्रीच्या उंचच उंच शिखरांवर रचलेले. ४५७४ फूट उंचीवरचा राजगड घाटमाथ्याच्या ऐन गाभ्यातील सह्यद्रीच्या रांगेवर वसलेला, तर २८५२ फूट उंचीचा रायगड ऐन कोकणात. कोकणात सरासरी २०० इंच पाऊस तर आजही पडतो. शिवकाळात झाडी दाट. मुद्दाम जोपासलेली, पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता. मग अशा परिस्थितीत तोफाबंदुकांची प्राणपणानं काळजी घेतली जायची. त्यासाठीचे कायदे नीटस होते. सारा विचार करून रचलेले होते.

त्यासाठी तोफा बंदुकांस तेलामेणाचे लेप देऊन ठेवत. तोफांच्या वाती ओवायची छिद्रे- त्यांना म्हणायचे काने- हे काने म्हणजे तोफेचा प्राण. काना खराब झाला की त्या तोफेची झाली फुंकनळी! म्हणून मग त्या कान्यात नीट निरातीने मेण ओतून तो बंद करून ठेवायचा. मग तटबंदीवरील साऱ्याच तोफांवर जागीच निरगुडी आदिकरून झुडपांची झापे करून पावसाळाभर त्या तोफेस पाणी लागणार नाही हे कटाक्षाने पाहिले जाई. अगदी हीच काळजी बंदुकांचीसुद्धा घेतली जाई, कारण दारूगोळा अन् शस्त्रे सुरक्षित राहिली तर दुर्ग सुरक्षित अन् दुर्ग सुरक्षित राहिला तरच राज्य सुरक्षित राहणे शक्य असते. या तोफा गंजू नयेत व त्या उत्तम स्थितीत आहेत याची खातरजमा करण्यासाठी त्या मधून मधून उडवून पाहत व नंतर त्या कलाली दारूने म्हणजे प्यायच्या दारूने धुऊन स्वच्छ करत. मोठय़ा तोफांस कधी डांबरसुद्धा लावत. तेलासोबत चंद्रसाचाही वापर करत. तोफांस बुचे म्हणून ताग वापरीत. इ.स. १८०५-०६ मधला रायगडच्या पहाऱ्याचा उल्लेख आहे की, महादरवाजावर दोन र्बकदाज दिवसरात्र खडय़ा पहाऱ्यावर असत. त्यांच्या बंदुका सतत भरलेल्या असत. परंतु हवेने दारू सर्द होत असल्यामुळे दर आठव्या दिवशी ते बार उडवून टाकीत. एका बंदुकीचे वर्षांचे ४८ याप्रमाणे दोघांचे ९६ बार फुकट जात. मात्र यासाठी येणारा दारूचा खर्च रायगडाच्या खर्चात मांडला जाई. शुद्ध पक्षातील बीजेच्या दिवशीही चंद्रदर्शन झाले की तोफेचा बार काढत. तो खर्चसुद्धा गडखर्चात समाविष्ट होई.

रायगडच्या महादरवाजास पावसाळ्यात तेल व मेण लावत. त्यासाठी अर्धा मण मेण व एक मण तेल एका दरवाजास लागे. ही माहिती मराठा साम्राज्याच्या अखेरच्या काही वर्षांतील आहे. मात्र दुर्गाच्या काळजीची मानसिकतासुद्धा काहीशी स्पष्ट करणारी आहे. कुणीही तर्क करू शकतो की, ‘गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे वसतिस्थळे, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी किंबहुना गडकोट म्हणजे प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्रास आणून त्यानुसार उद्यम करावा,’ असे कटाक्षाने बजावणाऱ्या शिवछत्रपतींच्या काळात दुर्गाची, त्यातही राजगड व रायगडासारख्या राजधान्यांची व्यवस्था कशी  करोल अन् चोख होती असेल! रायगडावरचा दप्तरखाना जर सुरक्षित राहिला असता तर?

या तोफा चालवणारे गोलंदाज, ते बहुश: मुसलमान असत. ते हुन्नरी, विश्वासू व घरंदाज, पक्क्या निशाणाचे म्हणजे दारूगोळा फुकट न घालविणारे असेच असत. ते दुर्गाच्या गरजेएवढे वा त्याहून अधिक ठेवले जात. दुर्गावरील तोफांच्या प्रमाणात यांची संख्या असे. तोपची असेही यांचे दुसरे नाव.

याशिवाय मग दुर्गावर ब्राह्मण, ज्योतिषी, वेदविद्या जाणणारे व्युत्पन्न, रसायनशास्त्र जाणणारे वैद्य, शस्त्रांच्या जखमा शिवणारे न्हावी, मंत्रतंत्र जाणणारे पंचाक्षरी, तसेच लोहार, सुतार, पाथरवट, चांभार या पेशांतील एक-एक दोन-दोन माणसे दुर्गाच्या व्यापानुसार वा गरजेनुसार हरएक गडावर असत. राजगड रायगडासारख्या राजधानीच्या दुर्गावर तर या मंडळींची खाती वेगळीच असण्याची दाट शक्यता भासते. मागील पानांवर म्हटल्याप्रमाणे रायगडावर असलेल्या शस्त्रास्त्रांची जंत्री व संख्या पाहिली तर गडावरील लोहार-सुतारांच्या संख्येचा तर्क करणेही कदाचित अशक्यप्राय होईल!

नित्यनमित्तिक पूजाअच्रेची जबाबदारी ब्राह्मणाकंडे असे. ज्योतिषशास्त्राचा आधार नाना गोष्टींसाठी घेतला जाई. पाडव्याच्या मुहूर्तावर पंचांग सांगणे; स्वाऱ्याशिकारींचे, पायाभरणीचे, नांगराचे, औताचे असे नाना मुहूर्त काढणे व सांगणे यांसाठी बहुधा ज्योतिषांचे प्रयोजन असावे. वैद्यांचे काम अतिशय महत्त्वाचे. युद्धांचा, धामधुमीचा काळ. जखमा, आजारणे हे बहुधा सुरूच असायचे. त्याव्यतिरिक्त राजधानीसारख्या जागी वस्ती जास्त. स्वत: राजा व त्याचा कुटुंबकबिला त्या दुर्गावर मुक्कामाला. मग या शास्त्रातले दिग्गज या गडांवर असायलाच हवेत. हे अशासाठी म्हटले की, असे स्पष्ट उल्लेख तत्कालीन कागदपत्रात निदान आजतागायत सापडलेले नाहीत. हे वैद्य नानाविध भस्मे, चूर्ण, अवलेह, रसायने तयार करीत असावेत. औषधे, मुळ्या, पाने, फुले या सगळ्यांचा संग्रह राखत. कोणत्या वेळेस काय लागेल याचा नेम कुणी सांगावा. जखमा शिवणारे न्हावी हेही महत्त्वाचे. शस्त्रास्त्रांनी झालेल्या जखमा बांधणे, शिवणे ही कामे यांच्याकडे असायची. वेदविद्या जाणणाऱ्यांची आवश्यकता बहुधा पोथीशाळेत भासत असावी. पोथ्यांची देखभाल, त्यांचे वाचन, त्या ग्रंथांच्या नकला, धर्मचर्चा, धर्मवार न्यायनिवाडे यांमध्ये यांचे बहुत साह्य होत असावे. त्याशिवाय मग पोतनीस, फडणीस, वाकनीस, मुजुमदार, सेनानी, पेशवे, सुरनीस, न्यायाधीश, मंत्री, दानाध्यक्ष आदी नामांकित मंडळींचा मुक्काम या दोन्ही राजधान्यांमध्ये झालेला आहे. अन् मग पर्यायाने या तालेवारांच्या मदतनीसांचा अन् त्यांच्या त्यांच्या खात्यांचाही पसारा या दुर्गावर होता.

मात्र या नानापरींच्या हुन्नरी माणसांस वर्षभर काम असेलच असेही नाही. म्हणून जेव्हा त्यांचे काम असेल तेव्हा त्यांनी ते करणे हे गृहीतच होते. मात्र ते नसे तेव्हा त्यास इतरही कामे सांगून ती करवून घेतली जात. रिकामटेकडा माणूस शिवछत्रपतींच्या शिस्तीत बसत नसे. तो धान्यातल्या खडय़ासारखा दूर फेकला जाई.

स्वराज्यातल्या सर्वच दुर्गावर सन्य, पसा, उपयुक्त वस्तू, धान्याची कोठारे, दारूगोळा यांचा भरपूर संग्रह असावा अशी राजाज्ञा होती. कारण याविना केवळ दुर्ग कुचकामी ठरतो असे त्यांचे मत होते.

हे एवढे केलेत तर पश्चात्तापाची पाळी येणार नाही अशीही त्यांची पक्की धारणा होती!