तलाकच्या मुद्यावर मी ६० वर्षांपासून लढत राहिलो. आता महिलासांठी समतेवर आधारित समान नागरी कायदा व्हावा, यासाठी लढा उभारणार असल्याचे पद्मश्री पुरस्कार विजेते सय्यद महबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले. यावेळी कादरी म्हणाले, आजवर मी अनेक आंदोलने पाहिली. मात्र देशात पहिल्यांदाच एखाद्या कायद्याविरोधात महिलाही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही घटनेनुसार चालणारी माणसं आहोत, असे मतही कादरी यांनी व्यक्त केले. आम्ही भारतीय असून ही आमची भूमी आहे. तसेच, या ठिकाणी राहणारे सर्व मुस्लीम हे १०० टक्के भारतीय आहेत, या नजरेतून पाहण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.