गेल्या २०-२५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या पक्षांनी स्वत:च्या कामाचा हिशेब दिल्यानंतरच मला प्रश्न विचारावेत, असे राज ठाकरे यांनी शनिवारी नाशिक येथील जाहीर सभेत सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करत असलेल्या माझ्या विकासकामांमध्ये सरकार जाणुनबुजून अडथळे घालत असल्याचा आरोपही राज यांनी सभेत केला. आचारसंहितेचे कारण पुढे करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेले सात महिने नाशिक महानगरपालिकेवर आयुक्त नेमण्यासंदर्भात टोलवाटोलवी केली. आयुक्ताअभावी येथील अनेक विकासकामे रखडून पडली आहेत आणि आता तेच सरकार महानगरपालिकेतील मनसेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या हातात निधी नसल्यामुळे आपण कॉर्पोरेट निधी आणून गोदा पार्कसारखा प्रकल्प उभारला. याच धर्तीवर संपूर्ण नाशिक शहराचा मला विकास करायचा आहे. परंतु, सरकारकडून त्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचे राज यांनी सांगितले.
यावेळी आर.आर. पाटील यांनी तासगाव मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपांनाही राज ठाकरेंनी उत्तर दिले. या मतदारसंघातील मनसेचे अस्तित्व खुपत असल्यामुळेच आर.आर. पाटील यांनी सुधाकर खाडेंवर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडल्याचा आरोप राज यांनी सभेत केला.