शेती व्यवसाय करताना त्यासोबत विविध जोडधंद्यांची सांगड घालावी लागते. यामध्ये पशुपालन हा व्यवसाय उत्पन्नासोबतच शेतीसाठी सेंद्रीय खतांचा पुरवठा करणारा एक मुख्य मार्ग ठरू शकतो. अशा या पशुपालनात त्यांचे संगोपन आणि व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.
पशुधन हा शेतकऱ्याचा केवळ जोडधंदा नसून, जमिनीची मशागत करण्याबरोबरच सेंद्रीय खतांचा पुरवठा करण्याचा मार्ग आहे. दावणीला चार-दोन जनावरे हवीतच, अशी मानसिकता आजही शेतकरी वर्गाची आहे. आज काही कुटुंबे केवळ पशुधनाच्या जोरावर संसार चालवत असून, व्यावसायिक दुग्ध उत्पादनही केले जात आहे. दुधाची शाश्वत गरज असल्याने योग्य पद्धतीने संगोपन आणि व्यवस्थापन केले, तर निश्चितच याचा फायदा होऊ शकतो. केवळ दावणीला चार-दोन जनावरे बाळगणे म्हणजे दुग्ध व्यवसाय ठरत नाही, तर त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज जशी आहे, तशीच पावसाळी हंगामात त्याची योग्य निगा राखणेही गरजेचे ठरते.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यात पेड, ता. तासगावमध्ये कापूर ओढ्याला आलेल्या पुरात दावणीला बांधलेल्या चार जनावरांचा मृत्यू झाला. ही जशी वैयक्तिक हानी आहे, तशीच सामाजिकही आहे. योग्य पद्धतीने पशुधनाची निगा राखली, तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्याला तर होईलच, पण याचबरोबर शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले शेणखतही मिळेल. त्यामुळे जमिनीची लोप पावत चाललेली नैसर्गिक सुपीकताही राखण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनांमध्ये विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवत असतात. या कालावधीत वातावरणातील बदलांचा ताण येऊन रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच, उत्पादकतेवरही परिणाम होतो. यामुळे पशुपालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच व्यवस्थापनाच्या कामांचाही ताण वाढतो. पशुधनातील रोग प्रादुर्भाव व उत्पादकता घटल्यामुळे पशुपालकांचे नुकसान होते. यासाठी पावसाळ्यात व आनुषंगिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधन व्यवस्थापनांतर्गत घ्यावयाची दक्षता याबाबत जाणून घेऊया.
पावसाळ्यात आणि आनुषंगिक अतिवृष्टी, गारपीट, वीज पडणे व पूरस्थिती या आपदांमध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी यासाठी वेळीच नियोजन शक्य होण्यासाठी वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे व त्यानुसार तयारी करावी. पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या संदेशाप्रमाणे सतर्क राहावे. तसेच, वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. पावसाळ्यात विविध रोगजंतूंची वाढ झपाट्याने होत असते. यासाठी पशुधनाची व त्यांचा निवारा, चारा, खाद्या व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या दृष्टीने खालीलप्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
निवारा
पावसाचे पाणी गळणे, भिंती ढासळणे, पशुधनाच्या शेडवर वृक्ष पडणे यामुळे पशुधनाचे नुकसान होऊ नये यासाठी पशुधनाच्या निवाऱ्याची वेळीच डागडुजी करून घ्यावी. तसेच निवाऱ्याशेजारील धोकादायक वृक्षांची छाटणी करून घेणे आवश्यक आहे. निवारा नसल्यास निवारा तयार करावा. निवारा शक्यतो कोरडा राहील, याची दक्षता घ्यावी. गोठ्यातील जमिनीचा ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की शिंपडावी. शेड व निवाऱ्याचे नियमित निर्जंतुकीकरण करावे. पावसाचे पाणी पशुधनाच्या निवाऱ्याजवळ साचू नये, यासाठी आवश्यक चर काढण्याची दक्षता घ्यावी. पशुधनासाठीचा निवारा सखल भागात असल्यास शक्यतो अतिवृष्टीच्या कालावधीत पशुधन सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे.
चारा
नवीन हिरव्या चाऱ्यामुळे हगवण, तसेच एचसीएन व नायट्रेट विषबाधा, हायपोमॅग्नेशिअॅमिक टिटॅनी यांसारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कापणीयोग्य स्थितीतील चाऱ्याचा वापर करावा. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता ठेवावी. तो भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधनास अतिवृष्टीच्या कालावधीत चरावयास सोडू नये. बहुतांश वेळा शेळ्या, मेंढ्या अतिवृष्टीमुळे श्वसनसंस्थेच्या आजाराने मृत्युमुखी पडतात. हिरवा चारा कापून पुरेसा साठा करून ठेवावा. नदीकडील भागात जनावरे चरावयास सोडू नये. शक्यतो चारा पावसाने भिजलेला असू नये. तसेच, साठवलेला चारा पावसाने भिजणार नाही, याची दक्षता घ्यावी. साठवण कोरड्या जागेत असावी. बुरशी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बुरशीयुक्त चारा देण्याचे टाळावे. मूरघास साठवण चरामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात वातावरणाची तीव्रता / पावसाची दीर्घकालीन उघडीप/तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी यांच्यामुळे उगवलेल्या गवतावर / चाऱ्यावर विपरीत परिणाम होऊन त्यातील विषद्रव्यांची साठवण वाढते. त्यामुळे ते जास्त घातक ठरतात. नायट्रेट व एचसीएन विषबाधेच्या घटना वाढण्याची शक्यता जास्त असते.
पिण्याचे पाणी
स्वच्छ व निर्जंतुक पाणी पशुधनास पिण्यास उपलब्ध असावे. पशुधन साचलेले पाणी पिणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पशुधनास साचलेले पाणी पिण्यास देऊ नये. पिण्याच्या पाण्याच्या हौदाची स्वच्छता करावी. शेवाळ जमा झालेले असल्यास ते काढून टाकावे. या हौदास चुना लावून घ्यावा.
आरोग्य
पावसाळ्यापूर्वी पशुधनास जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे. साथरोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तज्ज्ञांच्या साह्याने लसीकरण करून घ्यावे. मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, तर शेळ्या, मेंढ्यांमध्ये घटसर्प, आंत्रविषार लसींचे मान्सूनपूर्व लसीकरण करावे. दुभत्या पशुधनाच्या कासेच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. गाभण, व्यालेल्या पशुधनाची व नवजात वासरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या जनावरांची प्रतिकारशक्ती प्रभावित झालेली असते. स्थलांतरित पशुधनाची निवाऱ्याची विशेष दक्षता घ्यावी. बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी. माशांच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधक औषधफवारणी करावी. शेण व लेंड्यांच्या विल्हेवाटीसाठी शेणखताचा खड्डा असावा. तो शेडच्या अती जवळ असू नये. विसर्जित मूत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा शोषखड्डा असावा.
पशुधनाचे व्यवस्थापन
पूरस्थिती निर्माण झाल्यास पशुपालकांनी त्यांच्या पशुधनास सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. तसेच, पोल्ट्री फार्मचालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. पशुधनास पाण्यात न भिजलेला चारा व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. उपलब्धतेनुसार पशुखाद्या व क्षार मिश्रण द्यावे. पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी पोटॅशिअम परमॅग्नेट १ ग्रॅम प्रति ४ लिटर अथवा मेडिक्लोअर १ मिलि प्रति १० लि. पाणी या प्रमाणात वापरण्यात यावे. पशुधनास, त्याच्या प्रजातीनुसार (जसे – गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी वर्ग, मेंढी वर्ग, इत्यादी) स्वतंत्र निवारा द्यावा. सर्व पशुधनाची एकाच ठिकाणी अतिगर्दी टाळावी. अतिवृष्टीमुळे पशुधनांमध्ये घटसर्प, लेप्टोस्पायरॉसिस, फुटरॉट या रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता असते. पशुधनामध्ये रोगाची लक्षणे दिसून आल्यास पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. अतिवृष्टी झालेल्या सर्व भागांमध्ये घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण तत्काळ करवून घ्यावे. मृत पशुधनाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी.
digambarshinde64@gmail.com