पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभासाठी नामांकित उद्योजक मुकेश अंबानी, अदानी यांच्यापासून अभिनेते-अभिनेत्री कंगना राणावत, विवेक ओबेरॉय यांच्यापर्यंत अनेक प्रतिष्ठित राष्ट्रपती भवनावर आलेले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते, रणनीतीकार, अभ्यासक, कार्यकर्ते हेही उपस्थित होते. भाजपची एक महत्त्वाची व्यक्ती मात्र गैरहजर होती ती म्हणजे प्रज्ञासिंह ठाकूर. खासदार झाल्याने ‘माननीय’ ठरलेल्या प्रज्ञा ठाकूर शपथविधी दिवशी म्हणजे गुरुवारी दिल्लीत होत्या. त्यांच्याकडे निमंत्रण पत्रिकाही होती पण, माननीय प्रज्ञा ठाकूर यांना व्हील चेअरवरून फिरावं लागतं. त्यामुळं त्यांना मदतनिसाची गरज नेहमी लागते. शपथविधीसाठी जायचं तर दोन निमंत्रण पत्रिकांची गरज होती. बहुधा त्यामुळं आठ हजार जणांच्या साक्षीनं झालेल्या या सोहळ्याला प्रज्ञा गैरहजर राहिल्या असाव्यात. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाच्या बैठकीत प्रज्ञा उभं राहून मोदींना अभिवादन करताना दिसल्या खऱ्या! या शपथविधी समांरभाला एक साधू व्हील चेअरवरून आलेले होते. त्यांना मदतनीसही देण्यात आलेला होता. तसं असेल तर ‘साध्वीं’नाही येता आलं असतं. माननीय खासदारांनी वादग्रस्त विधान केल्यामुळं मोदी त्यांच्यावर नाराज आहेत असं म्हणतात. मोदींच्या नाराजीमुळं भोपाळच्या लोकप्रतिनिधीने शपथविधीकडं पाठ फिरवली की, राजकीय महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली म्हणून?. त्यांच्या गैरहजेरीचं नेमकं कारण काय याची चर्चा सुरू आहे. पुढील महिन्यात संसदेचं अधिवेशन आहे. सभागृहात त्यांना बोलू दिलं जाईल का आणि किती बोलू दिलं जाईल यावर मोदी हे ‘प्रज्ञा’वंतांवर खरोखरच किती नाराज आहेत हे कळेल.

डोवल आणि जयशंकर

मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी दिवशी कोणी कोणी संभाव्य मंत्र्यांच्या याद्या बनवलेल्या होत्या. त्यात अनेकांची नावं होती, सुषमा स्वराज यांचादेखील समावेश केलेला होता. पण, शपथविधीला आलेल्या सुषमा सत्तेच्या खुर्चीत न बसता सत्तेकडे बघणाऱ्यांच्या खुर्चीत बसल्या. त्याच वेळी स्पष्ट झालं की, परराष्ट्र खात्यातील वातावरण बदलणार. लोकनियुक्त मंत्री आणि प्रशासनातून मंत्री बनलेला अधिकारी यांतील फरक आता ‘मोदी २.०’मधील परराष्ट्र खात्यात दिसायला लागेल. अलीकडच्या काळात सुषमा स्वराज यांचा लोकांमधील वावर तुलनेत कमी झालेला होता पण, ट्विटरवरून त्या लोकांच्या संपर्कात असत. विनोदाला विनोदानं उत्तर देत. कधी सुषमा ठणकावून सांगत. कधी त्या मिश्कीलपणे प्रत्युत्तर देत. लोकांच्या समस्या तातडीनं सोडवत. हा ‘लोकसंवाद’ नव्या वातावरणात होईलच असा नाही. नवे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा सामान्य लोकांशी फारसा संपर्क आलेला नाही. परराष्ट्र सचिवपद सांभाळल्यामुळं त्यांचा संवाद राजनैतिक मुत्सद्दय़ांशी अधिक असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळं ते ट्विटरवरून लोकांना किती प्रतिसाद देतात हे पाहायचं! अमेरिका मोदींना व्हिसा देत नव्हती. पण, मोदी पंतप्रधान झाल्यानं अमेरिकेचा नाइलाज झाला. मोदी आणि अमेरिकेचं नेतृत्व यांच्यातील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यात जयशंकर यांचा मोठा हात होता, असं म्हणतात. साऊथ ब्लॉकमधील सत्तेची समीकरणं कशी बदलू शकतात हेही पाहण्यासारखं असेल. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख अजित डोवल आणि तत्कालीन परराष्ट्र सचिव म्हणून जयशंकर हे मोदींच्या दोन्ही हातांना राहिलेले आहेत. एक हेर आणि दुसरा मुत्सद्दी. दोघांनीही आपापलं वर्तुळ राखत समन्वयाचं धोरण अवलंबलं होतं. आता दोघेही संरक्षणविषयक मंत्रीगटात असतील. त्यामुळं मोदींच्या नव्या रचनेत डोवल आणि जयशंकर यांचे संबंध कसे राहतात हेही समजेल.

‘ज्ञानी’ पोखरियाल

नवे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘नि:शंक’, समोरच्या माणसाशी गोड बोलतात. त्यांच्या स्वभावातच गोडपणा आहे. कुठल्याही मुद्दय़ावर ते हसून उत्तर देतात. काही माणसं खरोखरच गोड बोलतात. काहींच्या गोडपणात ढीगभर साखर खाल्ल्याचा भास होतो. पोखरियाल यांचा गोडपणा दुसऱ्या प्रकारात मोडतो. पोखरियाल उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. पण, त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. त्यांच्याकडे आता देशाचं भावी मनुष्यबळ विकसित करण्याचं काम मोदींनी दिलेलं आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्याने ते काम चोख करतील अशी आशा मोदीसमर्थकांना वाटते. मंत्रिपदाची सूत्रं घेतल्यानंतर लगेचच नव्या शिक्षण धोरणाचा अहवाल त्यांना सादर केला गेला. मंत्रिमहोदय त्याचा अभ्यास करून शिक्षण व्यवस्थेला दिशा देतील असं दिसतंय. त्यांना डॉक्टर म्हणवून घ्यायला आवडतं. त्यांच्याकडं दोन मानद ‘डी. लिट्.’ आहेत. पण आता त्यांच्या पदवीचा वाद कोणी तरी सुरू केला आहे. स्मृती इराणी मनुष्यबळ विकासमंत्री होत्या तेव्हा त्यांच्याही पदवीचा वाद कोणी तरी निर्माण केला होता. इराणी यांनी येल विद्यापीठातून पदवी घेतल्याचं सांगितल्यानंतरही वाद मिटला नाही! मनुष्यबळ विकास मंत्रालयाला असे वादग्रस्त मंत्री मिळालेले आहेत. प्रकाश जावडेकर मात्र वादापासून लांब राहिले. वाद घालणं हे जावडेकरांच्या स्वभावातच नाही. पोखरियाल यांचं म्हणणं आहे की, विज्ञानांपेक्षा ज्योतिषशास्त्र मोठं असतं. ज्योतिषशास्त्राचा प्रसार केला पाहिजे.. लाखो वर्षांपूर्वी महर्षि कणाद यांनी अणुस्फोटाचं तंत्र विकसित केलेलं होतं. त्यामुळं भारतासाठी अणुबॉम्ब बनवणं नवं नाही.. पोखरियाल यांना जे माहिती आहे ते बहुधा इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांना माहिती नसावं! पुढील पाच र्वष मनुष्यबळ विकासमंत्री विज्ञानाला महत्त्व देतात की, ज्योतिषशास्त्राला याकडे युवा पिढीचं लक्ष असेल.

नवे पोलादी पुरुष

देशाचे मूळ पोलादी पुरुष होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेलांनी संस्थानिकांवर कारवाई केल्याने देश अखंड राहिला. या धोरणीपणामुळं त्यांना पोलादी पुरुष म्हणतात. पण त्यानंतर भाजपमध्ये अनेक पोलादी पुरुष झाले. लालकृष्ण अडवाणी यांना पोलादी पुरुष म्हटलं जाऊ लागलं. मोदी हे पोलादी पुरुष झाले. रोखठोक निर्णय घेण्याची मोदींची क्षमता, ‘करून दाखवण्या’ची त्यांची धडाडी, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं त्यांचं धाडस ही काही कारणं त्यामागं असावीत. आता भाजपमध्ये नवा पोलादी पुरुष निर्माण होऊ लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे भावी पोलादी पुरुष म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे. नेहरूंमुळं सरदार पटेलांना काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही आणि नेहरूंमुळं कलम ३७० आलं. नेहरूंमुळं काश्मीर प्रश्न चिघळला, अशी भाजपमधील मंडळींची धारणा आहे. काश्मीर प्रश्न सरदारांचे ‘वारसदार’ही सोडवू शकले नाहीत! आता भाजपसमर्थकांच्या आशा अमित शहांवर केंद्रित झालेल्या आहेत. शहांनी पश्चिम बंगालमध्ये आक्रमक ममता बॅनर्जीना धडा शिकवलेला आहे. ते गृहमंत्री झाल्याने पोलीस यंत्रणेवर त्यांचं नियंत्रण असेल. खमकेपणा त्यांच्याकडं आहेच. आता त्यांचं लक्ष काश्मीर हेच असेल असं भाजप समर्थक सांगू लागलेले आहेत. काश्मीर भारताशी एकरूप होण्यात अडचणीची ठरलेली ३७०, ३५-अ कलमं जातील मग, सरदारांनी हाती घेतलेलं काम खऱ्या अर्थानं पूर्ण होईल असं म्हणणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढीला लागलेली आहे.