सोळाव्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो नवमतदार आणि तरुणाईच्या सहभागाचा. आजच्या निकालाच्या दिवशी या तरुणाईच्या मनात नेमकं काय चालू आहे? देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुण जबाबदार नागरिकांना या निवडणुकांमधली सगळ्यात सकारात्मक बाब कोणती वाटते आणि सगळ्यात निराशाजनक काय वाटतं, हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न.

देशाच्या सोळाव्या लोकसभेचा चेहरा आज स्पष्ट होईल. ही पुरवणी तुमच्या हाती पडेल तेव्हा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालीही असेल. या निवडणुकीत तरुणाईचा वाढलेला आणि सक्रिय सहभाग हा महत्त्वाचा घटक ठरला. तरुण आणि नवमतदार या वेळच्या निवडणुका वेगळ्या ठरवतील असं बोललं जात होतं. त्यांना वश करून घेण्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली होती.
 तरुणाईला आजच्या दिवशी काय वाटतंय, निवडणुकीची सकारात्मक बाब कोणती वाटतेय, सगळ्यात निराशाजनक काय असेल असं वाटतंय आणि त्यांच्या नव्या सरकारकडनं अपेक्षा काय असतील, हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्यभरातील अनेक तरुण मतदारांशी बोललो. या सगळ्यातून समोर आलेला प्रमुख मुद्दा म्हणजे – आम्हाला बदल हवा होता आणि म्हणूनच आम्ही मतदान केलं. निवडणुकांनंतर एक स्थिर सरकार आता अपेक्षित आहे. तरच आर्थिक विकासाची अपेक्षा करू शकतो, असं तरुणाईनं स्पष्ट केलं.
एक्झिट पोलनुसार निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाली तरी कुणी तरुणांना गृहीत धरू नका, असा इशाराही या तरुणांच्या बोलण्यातून जाणवत राहिला. काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता अपेक्षित बदल हीच सकारात्मक बाजू त्यांना दिसतेय. कामगिरी चांगली नसेल तर अन्य मुद्दे गौण ठरतात हे आम्ही दाखवून दिलं, असं तरुणांचं म्हणणं.
या निवडणुकांमध्ये प्रथमच उतरलेला आणि तरुणाईनं उचलून धरलेला पक्ष म्हणून आम आदमी पक्षाची चर्चा होती. प्रत्यक्षात एक्झिट पोलच्या अंदाजात तरी ‘आप’ला फारसं यश मिळालेलं दिसत नाही. त्याबद्दल तरुणाई फार विचारपूर्वक बोलते. ‘आप’चा पर्याय हा भविष्यकाळासाठी आहे. आता अपेक्षा स्थिर सरकारची असल्यानं जाणीवपूर्वक मतदान केलं, असं शहरी तरुण आवर्जून सांगतो. भ्रष्टाचाराला विरोध हा अजेंडा असणारा ‘आप’ अजूनही तरुणाईला जवळचा वाटतो. पण प्रॅक्टिकल पर्याय वाटत नाही. ‘आप’ विरोधी बाकांवर बसला असता, तर देशाच्या दृष्टीने फायद्याचं होतं. त्यामुळे सत्तेवरच्या पक्षावर अंकुश राहिला असता, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींची प्रतिमा बघता आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी प्रतिमा अबाधित राहील का, अशी शंका अनेकांनी बोलून दाखवली.
विकासाच्या राजकारणासाठी मतदान, भ्रष्टाचाराला विरोध हे मुद्दे  महत्त्वाचे ठरत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचं तरुणाईचं मत आहे. आता एकहाती सत्ता आली तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवेल असा विवेकी विरोधी पक्षही असावा, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
एकूणच नवं सरकार स्थिर असावं आणि त्यामागोमाग येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक विकासाच्या अपेक्षा त्यांनी बोलून दाखवल्या. तरुणाईसाठी एक विकासाचा अजेंडा हवा, शिक्षणव्यवस्थेत बदल हवेत, असे प्रचारामध्ये नसलेले मुद्देही तरुणाईनं अपेक्षांमध्ये बोलून दाखवले. आम्हाला गृहीत धरू नका आणि ज्यासाठी बदल अपेक्षित होता, ती अपेक्षा पूर्ण करा, हेच त्यांचे सांगणे आहे.
अरुंधती जोशी

सोशल मीडियावर पोकळ चर्चा
सोशल मीडियावर निवडणुकांची भरपूर चर्चा तरुणाईनं केली. पण ती बातम्यांवरची रिअ‍ॅक्शन, प्रचाराच्या जाहिरातींवरचे जोक्स, विडंबनात्मक चारोळ्या या पातळीवरच राहिली. तरुण ब्लॉगर्स रिअ‍ॅक्ट होताना व्यक्तिगत पातळीवरच्या राजकारणावरच भर देतात. प्रचारादरम्यान मुद्दे कमी आणि व्यक्ती जास्त चर्चिली गेली. तशी सोशल नेटवर्किंगवरून व्यक्त होण्याऐवजी शेअर करण्यावरच तरुणांची भिस्त होती. त्यामुळे अमूक एक मेसेज फॉरवर्ड करणारी व्यक्ती त्या विचारसरणीची असेलच असं काही थेट सांगता येणार नाही, अशी परिस्थिती होती.