वनक्षेत्र झपाटय़ाने कमी होत आहे आणि वनांवरचा दबाव वाढत आहे. पुनर्निर्मिती कमी होणे हे देखील त्यामागचे एक कारण असून, संयुक्त वन व्यवस्थापनाद्वारे वनांचे संरक्षण व संवर्धन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी केले.
वन विभागाच्यावतीने सेमिनरी हिल्सवरील वन सभागृहात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक आर.एल. चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी वन विभागाच्या इन्ट्रानेट वेबसाईटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वनविभागाने ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले, त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वन सभागृहाच्या लॉनवर महाराष्ट्रातील वन आणि जैवविविधतेबाबत आकर्षक व माहितीपूर्ण बोलक्या छायाचित्रांच्या एकदिवसीय प्रदर्शनाचे एस.डब्ल्यू.एच. नकवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
निसर्गाने वन निर्माण केले, पण मधल्या काळात योग्यरितीने त्याचे संवर्धन झाले नाही. आज पृथ्वीवरील भूभागाच्या अवघ्या काही टक्क्यांवरच जंगल शिल्लक आहे. त्या वनांचे योग्यरित्या संवर्धन करून पुढच्या पिढीला ही वनसंपदा सोपविण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलावी, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णीकर यांनी केले. कार्यक्रमाला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) डॉ. मोहन झा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल मोहन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) डॉ. पी.एन. मुंडे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.एस.के. रेड्डी व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते. उपवनसंरक्षक पी.के. महाजन यांनी यावेळी सर्वाचे आभार मानले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 10:44 am