गेल्या वर्षी नदी-नाल्यांतील गाळ काढण्याची कामे विलंबाने सुरू झाल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या प्रशासनाला यंदा आधीच जाग आली आहे. मिठी नदी, वाकोला नदी प्रणाली, पातमुखे आणि मोठय़ा नद्यांमधील गाळ उपसण्यासाठी १५ कोटी ८६ लाख रुपयांची कामे कंत्राटदारांवर सोपविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सांताक्रूझ (पू.) येथील मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी (धारावी पूल ते प्रेमनगर पातमुखापर्यंत) ५ कोटी २० लाख रुपये, सांताक्रूझ (पू.) येथील वाकोला नदी प्रणालीमधील मोठय़ा नाल्यांतील गाळ काढण्यासाठी २ कोटी ६९ लाख ९० हजार रुपये, शहरातून जाणाऱ्या मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी २ कोटी ५५ लाख ९० हजार रुपये, गांधी नगर व नाईक नगर पातमुखांच्या स्वच्छतेसाठी ५ कोटी ४० लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठी नदीची पातमुखे, वाकोला नदी प्रणाली आणि मोठय़ा नाल्यांसाठी पावसाळ्यापूर्वी १५ कोटी ८६ लाख २० हजार रुपये खर्च करुन गाळ काढण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे गाळ उपसण्याची कामे वेळेवर होतील  आणि पावसाळ्यापूर्वी धावपळ होणार नाही, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.