कोंढाळी मार्गाने भरधाव वेगात येणारी टाटा सफारी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने त्यात पाच जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ठार झालेले सर्वजण अलाहाबादमधील कोरवा गावाचे राहणारे असून एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
अपघातामध्ये ठार झालेल्यामध्ये प्रतिभा बुद्ध सिंह (३५), नरेंद्र कुमार यादव, प्रिया बुद्ध सिंह, धर्मराज सिंह यादव (६०), श्रीमती राजनसिंह धर्मराजसिंह (६५), ही अपघातामध्ये ठार झालेल्यांची नावे असून गाडीचा चालक संदीप पांडे, प्रवीण बुद्धसिंह (१०), प्रितीबुद्ध सिंह (१२) हे तिघे जखमी आहे. कोंढाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलाहाबादमध्ये राहणारे सिंह कुटुंब मुंबईला गेले होते. आज पहाटे ते अमरावतीवरून कोंढाळी मार्गाने येत असताना दशमेश ढाब्याजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर जाऊन त्यांची भरधाव वेगात येणारी टाटा सफारी गाडी इतकी जबरदस्त वेगात आदळली.
अपघात होताच ढाब्यामध्ये असलेले कर्मचारी आणि काही ट्रक चालकांनी लगेच गाडीतील लोकांना बाहेर काढण्याचा प्रत्यन केला मात्र अपघात अत्यंत भीषण होता. पाच लोक जागीच ठार झाले होते. प्रवीण बुद्ध सिंह आणि प्रीती बुद्ध सिंह हे दोघे बहीण भाऊ गाडीत मागच्या भागात बसले होते त्यामुळे ते बचावले. गाडीला चालक संदीप पांडेला जबर मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तिघांना पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी मेडिकलमध्ये आणण्यात आले. अलाहाबादमधील कोरावा गावात राहणारी ही सर्व मंडळी एकाच कुटुंबातील असून सर्वजण मुंबईला फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी रात्री अमरावतीला मुक्काम केल्यानंतर आज सकाळी नागपूरमार्गे जबलपूरला नातेवाईकांकडे जाणार होते मात्र, कोंढाळी मार्गावर त्यांच्यावर काळाने झडप घातली. टाटा सफारी गाडी इतकी वेगात होती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे किंवा त्याला डुलकी आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी ठार झालेल्याचे पार्थिव मेडिकलला पाठविले. अलाहाबादमधील त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून ते नागपूरला निघाले आहे. कोंढाळी पोलीस या अपघाताची चौकशी करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
कोंढाळीजवळ भीषण अपघातात पाच ठार
कोंढाळी मार्गाने भरधाव वेगात येणारी टाटा सफारी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने त्यात पाच जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ठार झालेले सर्वजण अलाहाबादमधील कोरवा गावाचे राहणारे असून एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

First published on: 27-06-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 killed 3 injured in road mishap near kondhali