मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात अवजड वाहनांचे होणारे अपघात गॅमन इंडिया कंपनीच्या बेपर्वाईमुळे वाहतूक ठप्प होण्याबरोबर इतर वाहनधारक आणि महामार्ग पोलिसांसाठी नेहेमीची डोकेदुखी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री या महामार्गावर दोन मालमोटारींचा अपघात झाल्यावर पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. गॅमन इंडिया कंपनीने क्रेन उपलब्ध करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे सुमारे १५ तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली. महत्वाची बाब म्हणजे, या दिरंगाईमुळे सोमवारी सकाळी आणखी एक मोटार अपघातग्रस्त होऊन उलटली. अपघातग्रस्त तिन्ही वाहने महामार्गावरून बाजुला हटविली न गेल्याने महामार्ग पोलिसांना तारेवरची कसरत करणे भाग पडले.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर कसारा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला खरा, परंतु, आता याच परिसरात होणाऱ्या अपघातावेळी वेगळीच समस्या भेडसावत आहे. गोंदे ते वडपे या टप्प्याच्या विस्तारीकरणाचे काम गॅमन इंडिया कंपनीने केले. त्यांच्यामार्फत घोटी टोल नाक्यावर वाहनधारकांकडून टोल वसुली केली जाते. ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ तत्वावर हे काम सोपविताना उपरोक्त कंपनीवर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त वाहने त्वरित बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करणे ही त्यापैकीच एक. परंतु, जेव्हापासून या मार्गावर टोल वसुली सुरू झाली, तेव्हापासून कंपनी ही जबाबदारी टाळत असल्याचा महामार्ग पोलिसांचा आक्षेप आहे. अपघातग्रस्त वाहने बाजुला हटविली जात नसल्याने वाहतूक ठप्प नाहीतर विस्कळीत होते. त्याचा फटका अन्य वाहनधारकांना बसतो, शिवाय महामार्ग पोलिसांना अपघातग्रस्त ठिकाणी सलग कित्येक तास ठाण मांडून वाहतूक नियंत्रित करावी लागते. अपघातग्रस्त वाहनमालकाने खासगी क्रेनची व्यवस्था केल्यानंतर ही वाहने बाजूला हटतात. तोपर्यंत त्या भागातील वाहतूक विस्कळीत राहते, असा आजवरचा अनुभव आहे.
रविवारी रात्री अपघात झाल्यावर त्याची पुनरावृत्ती झाली. रात्री साडे दहाच्या सुमारास कसारा घाटात ‘ब्रेक फेल पाईंट’वर दोन मालमोटारींची धडक झाली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मधोमध उभी होती. घाटातील हा परिसर तीव्र उताराचा आहे. यामुळे अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजुला करणे अत्यावश्यक होते. त्याची माहिती संबंधित कंपनीला कळविली गेली. परंतु, त्यांचे गस्ती पथकाचे वाहन वगळता कोणी वरिष्ठ अधिकारी या भागाकडे फिरकले नाही. अपघातग्रस्त मोटारींमधून सांडलेले ऑईल व डिझेलवर माती टाकण्यात आली. घाटातून वेगाने खाली येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रीपासून महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियमनाचे काम हाती घेतले. रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असणाऱ्या अपघातग्रस्त वाहनांमुळे सोमवारी सकाळी उतारावरून खाली येणारी आणखी एक मालमोटार उलटली. परिणामी, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दुपापर्यंत गॅमन इंडियाने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरुन बाजुला करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नसल्याची तक्रार महामार्ग पोलिसांनी केली आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणावेळी संबंधित कंपनीने अपघातग्रस्त अवजड वाहने उचलण्यासाठी उच्च क्षमतेची क्रेन चोवीस तास तैनात ठेवणे क्रमप्राप्त होते. परंतु, प्रत्यक्षात तशी व्यवस्था केली नसल्याने वाहनधारक व महामार्ग पोलीस वेठीस धरले गेले. या कंपनीकडे एकच कमी क्षमतेची क्रेन आहे. तिच्यामार्फत चारचाकी मोटार उचलली जाऊ शकत नाहीत, असे महामार्ग पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
.. तर गॅमन इंडियावर कारवाई
महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीसह जी जबाबदारी रस्ते विकास करणाऱ्या कंपनीवर सोपविल्या गेली आहे, त्यात कसूर केल्यावरून याआधी गॅमन इंडियावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अपघाताच्या उपरोक्त प्रकाराची छाननी केली जाईल. अपघातग्रस्त वाहने हटविण्याची जबाबदारी गॅमन इंडिया पार पाडत नसल्याबद्दल महामार्ग पोलीस विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला पत्र प्राप्त झाले आहे. अपघातग्रस्त वाहने हटविण्याची जबाबदारी या कंपनीची आहे.
बी. एस. साळुंके, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण