शहर व जिल्ह्य़ातील स्वयंपाकाच्या गॅस वितरकांनी स्वत:च्या सोयीचे नियम करून त्याबाबत ग्राहकांची दिशाभूल व अडवणूक करण्याचे प्रकार थांबवावेत; अन्यथा ग्राहक संघटना या वितरकांसमोर ठिय्या आंदोलन सुरू करेल, अशा इशारा गॅस ग्राहकांच्या मेळाव्यात देण्यात आला.
शहरातील ग्राहक संघटनांनी श्रमिकनगर येथील बालाजी मंदिरात संयुक्तपणे आयोजित केलेल्या या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी नरसय्या काटाबत्तीन होते.
गॅस वितरक स्वत:च्या सोयीने नियम तयार करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या नियमांबाबत माहिती दिली जात नाही, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी केली. गॅस वितरकांनी केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे फलक दुकानात दर्शनी भागावर लावण्याचा ग्राहकांनी आग्रह धरावा, तसेच ग्राहकांनीही वितरकांवर चुकीचे काम करण्याबाबत दबाव आणू नये, असे मेळाव्यात ठरवण्यात आले. तरीही वितरकांबाबत तक्रार आल्यास व त्यात तथ्य आढल्यास त्यांच्या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सबसिडीबाबत सध्या ग्राहकांनी गॅस कंपन्या, वितरक यांच्याकडून चुकीची माहिती दिली जात आहे. एकच गॅस जोड असेल तर केवायसी फॉर्म भरण्याची, तसेच बँकेत खाते सुरू करण्याची सध्या काहीही गरज नाही. ९ सिलेंडरवर सबसिडी मिळणार असे सांगितले जात असेल तरी तसा काहीही निर्णय सध्या तरी झालेला नाही, ते सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून आहे, सबसिडीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचा प्रकल्प महत्वाकांक्षी असला तरीही सध्या तो देशातील फक्त ५१ जिल्ह्य़ांत व त्यातही पुन्हा महाराष्ट्रातील फक्त पुणे जिल्ह्य़ात राबवण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्यात देण्यात आली. १ जुलै २०१३ म्हणजे थेट पुढच्या वर्षी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांनी लगेचच बँकेत खाती उघडण्याची घाई करू नये असेही सांगण्यात आले.
मेळाव्यात सर्वश्री शिरीष बापट, सुरेश रुणवाल, विलास जगदाळे आदींनी मार्गदर्शन केले. काटाबत्तीन यांनी ग्राहकांनी संघटीत झाल्यास काहीही अडचण येणार नाही, त्यामुळे संघटनेचे महत्व लक्षात घेऊन एकत्र यावे, असे आवाहन केले. राजेंद्र सामल,  किसनराव आडेप, राजेंद्र बुलबुले, राजेंद्र मुनोत, श्रीमती गौरी भोंग, आरती कुलकर्णी यांनी मेळाव्यातील चर्चेत भाग घेतला.