बालकांमध्ये नाटय़ क्षेत्राची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाल नाटय़ महोत्सवाचे रसिकांच्या अत्यल्प उपस्थितीत उद्घाटन झाले. पाचशे आसन व्यवस्था असलेल्या सभागृहात केवळ तीन परीक्षक आणि सहा रसिकांच्या उपस्थितीत महोत्सव प्रारंभ करण्यात आला. ‘इंडिया बेस्ट ड्रामेबाज’ फेम चिन्मय देशकर या बाल कलावंताच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. श्रोत्यांमध्ये यावेळी एकही बालक उपस्थित नव्हता हे विशेष. सांस्कृतिक संचालनालयाचे उपकेंद्र नागपुरात आले असतानाही बाल नाटय़ महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा संचालनालयाची सांस्कृतिक क्षेत्राबद्दलची अनास्था समोर आली आहे.  
 सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या नागपूर केंद्रावरील बाल नाटय़ स्पर्धेला सायंटिफिक सभागृहात अतिशय निराशजनक पद्धतीने प्रारंभ झाला असून त्यात अनेक बाल कलावंताचा हिरमोड झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता बाल नाटय़ स्पर्धेचे उद्घाटन असताना त्यावेळी सभागृहात केवळ तीन परीक्षकासह पाच ते सहा रसिक उपस्थित होते. त्यात एकही बालक उपस्थित नव्हता. दहा वाजता चिन्मय देशकर याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेहमीप्रमाणेच नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह किशोर आयलवार आवर्जुन उपस्थित होते. सुनील शिंदे, मुंबईच्या स्मिता घारपुरे आणि रितेश साळुंके हे तीन परीक्षक यावेळी उपस्थित होते.
उद्घाटन झाल्यानंतर वीरेंद्र लाटनकर दिग्दर्शित ‘खरा तो एकची धर्म’ या पहिल्या बाल नाटय़ाला प्रारंभ करणार मात्र त्यावेळी सभागृहात पाच ते सहा रसिक बसले होते. सभागृहात कोणीच नसल्यामुळे बालनाटय़ कोणासमोर सादर करणार असा आयोजकांना प्रश्न पडला असताना नरसाळा येथील सत्य साई विद्या मंदिर या शाळेच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना प्रेक्षक म्हणून सभागृहात आमंत्रित करण्यात आल्यानंतर संयोजकाला हायसे वाटले आणि बाल नाटय़ स्पर्धेला प्रारंभ झाला. नाटकाला प्रारंभ होत नाही तोच काही मिनिटातच सभागृहातील वीज गेली आणि अंधार झाला, ध्वनी व्यवस्था बंद पडली आणि उत्साहात बाल नाटय़ सादर करणारे बालक निराश झाले. नाटक मध्येच ब्ांद झाल्याने संयोजकाची धावपळ सुरू झाली. सभागृहाचे कामकाम बघणाऱ्या कर्मचाऱ्याला सभागृहात शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेतरी बाहेर होता. काही वेळात जनरेटर सुरू केले, मात्र तेही डिझेल नसल्यामुळे लगेच बंद पडले. वीज नसल्यामुळे सभागृहात असलेले अनेक बालक सभागृहाच्या बाहेर आले. जवळपास पंधरा मिनिटे हा घोळात घोळ सुरू असताना वीज आली आणि बाल नाटय़ पुन्हा सुरू झाले.
सांस्कृतिक संचालनालयाचे उपकेंद्र उपराजधानीत नुकतेच सुरू करण्यात आले असताना संचालनालयाचा केवळ एकच कर्मचारी यावेळी उपस्थित होता. वैदैही चवरे हिच्याकडे स्पर्धेच्या संयोजकांची जबाबदारी देण्यात आल्यामुळे तिची एकटीची धडपड यादरम्यान दिसत होती, मात्र संचालनालय आणि नाटय़ परिषदेचा एकही पदाधिकारी सभागृहाकडे फिरकला नाही. यापूर्वी स्पर्धेची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे होती. त्यांचा सावळा गोंधळ बघता संचालनालयाने शहरातील एका स्थानिक कलावंताला जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आणि नागपूरची जबाबदारी वैदेही चवरे हिच्याकडे देण्यात आली. आयोजनात तिचे प्रयत्न कमी पडत असल्याने हा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. याचा परिणाम बाल कलावंतांवर होत असल्याचे दिसून येत आहे. संचालनालयाचे उपकेंद्र नागपुरात सुरू करण्यात आल्यानंतर घोळ कायम आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक विभागातर्फे या स्पर्धावर लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र अशा पद्धतीने स्पर्धाचे आयोजन करण्यात आले तर या स्पर्धा कोणासाठी? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
स्थानिक कलावंतांची पाठ
बाल कलावंतांना व्यासपीठ मिळावे आणि बालरंगभूमी वाढावी या उद्देशाने प्रादेशिक पातळीवर बाल नाटय़ स्पर्धा सुरू करण्यात आली असली तरी स्थानिक ज्येष्ठ कलावंतांचे आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे पदाधिकारी स्पर्धेकडे फिरकत नाहीत. ज्या स्पर्धेतून आज अनेक कलावंत समोर आले आहे त्या स्पर्धेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने नवीन पिढीतील बाल कलावंतांवर अन्याय होऊ लागला आहे. केवळ उद्घाटन करून आता आपली जबाबदारी संपली, असे समजून अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे काही पदाधिकारी उद्घाटनानंतर स्पर्धेकडे फिरकत नाही. बाल रंगभूमी चळवळ राबवून कलावंतांना व्यासपीठ मिळवितो असा दावा करणारे अनेक ज्येष्ठ कलावंत बाल नाटय़ स्पर्धेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नव्या बाल कलावंतांनी कुणाकडे दाद मागावी? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.