विदर्भातील दहा जागांसाठी लोकसभा निवडणूक आटोपून एक आठवडा लोटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही लढतीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी लागणार असल्याने सध्या अंदाज, देवाला कौल लावणे तसेच पैजा लावणे असे प्रकार वाढले असून, सध्या काही राजकीय पक्षातील उमेदवारांचे भाव मोठय़ा प्रमाणावर वधारले आहेत.
२००४ आणि २००९ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी विदर्भात १० ते १२ टक्के मतदान जास्त झाले आहे. २००९ च्या निवडणुकीपेक्षा विदर्भातील विविध लोकसभा मतदार संघात मतदानाचे प्रमाणे वाढले असल्यामुळे कोण विजयी होईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. काही राजकीय पक्ष मतांचे गणित करण्यात व्यस्त असून विविध भागातील पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि प्रचार माध्यमांच्या प्रतिनिधीकडून आढावा घेत आहेत. मतमोजणीला जवळपास एक महिना शिल्लक असताना कोण जिंकेल आणि कोणाचा पराभव होईल याबाबत बाजारपेठांमध्ये पैज लावणे सुरू झाले आहे. विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशी लढत असली तरी काही अपक्ष उमेदवार आपापल्या पद्धतीने मतांचे गणित मांडून किती मते मिळतील याचा अंदाज घेत आहेत.
यावेळी अनेक मतदारांजवळ ओळखपत्रे असूनही त्यांना मतदान करता आले नाही, असे अनेक मतदार आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी करीत आहेत. या वेळी ओळखपत्रांची कडक अंमलबजावणी झाल्याने बोगस मतदानाला आळा बसला आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा फटका नेमका कोणाला बसतो, यावरून नेते अंदाज व्यक्त करीत आहेत. भाजपला विदर्भात सात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळतील, असे अंदाज बांधले जात आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येतील, अशी चर्चा शहरात आहे. नागपुरात नितीन गडकरी, वध्र्यातून रामदास तडस तर रामटेकमधून कृपाल तुमाने विजयी होतील असे वाटते, तर काही काँग्रेसचे कार्यकर्ते विदर्भात काँग्रेसला फारसे यश मिळणार नसल्याचे बोलतात. विदर्भातील अनेक उमेदवारांनी तर तीर्थस्थानी जाऊन देवदेवतांना मोठय़ा प्रमाणात रकमांचे नवस बोलून आले आहेत, तर काहींनी देवाला साकडे घातले आहेत. जिल्ह्य़ात किती टक्के मतदान झाले आहे, अर्थकारण सफल झाले आहे की नाही, कुठला उमेदवार किती मते घेईल? कोणत्या समाजाची मते कुणाला मिळाली, यावर सध्या आकडेमोड सुरू आहे.