अभिजात संगीताच्या जगभरातील दर्दी रसिकांची तृष्णा भागविणाऱ्या यंदाच्या हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवातील दुसऱ्या सत्रात गायन, वादन अन् नृत्याचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. या त्रिवेणी संगमाने अवघा रसिकराज तृप्त झाला. नव्या पिढीतील गायक रत्तन मोहन शर्मा यांच्या गायनाने सत्राची सुरुवात झाल्यानंतर अयान व अमान अली खान बंगश यांचे सरोदवादन, शोभना चंद्रकुमार यांचे भरतनाटय़म अन् सत्राचा समारोप करताना पं. राजन-साजन मिश्रा यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतील रितेश-रजनीश मिश्रा यांच्यासोबत दमदार गायन सादर करीत रसिकांची दाद मिळविली.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित व ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या या महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस होता. मंगळवारी रसिकांच्या उदंड प्रतिसादात सुरू झालेल्या या महोत्सवात बुधवारीही रसिकांची हजेरी मोठी होती. अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्दी चाहते.. जुने जाणते रसिकच नव्हे, तर नव्या पिढीतील युवा रसिकांचीही लक्षणीय उपस्थिती.. राज्यातील व देशातीलच नव्हे, तर प्रत्येक वर्षी नित्यनियमाने येणाऱ्या अस्सल संगीताची गोडी असणाऱ्या परदेशी पाहुण्यांचाही सहभाग.. तेच भारलेले वातावरण व त्याच नित्यनव्या संगीतानंदात महोत्सवातील आजच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. सत्राच्या सुरुवातीपासून ते अगदी समारोपापर्यंत स्वरमंडप दर्दी रसिकांच्या उत्साहाने भरून गेला होता.
रत्तन मोहन शर्मा यांच्या गायनाने सत्राची सुरुवात झाली. शुद्ध बऱ्हाडी रागात गायनाची सुरुवात करीत उत्तरोउत्तर त्यांनी रसिकांची दाद घेतली. शेवटी ‘अबिर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग सादर करून त्यांनी टाळ्या मिळविल्या. त्यानंतर अयान व अमान अली खान बंगश यांचे सरोदवादन झाले. सरोदवर लिलया फिरणारी बोटे व त्यातून निघणाऱ्या स्वरांवरील त्यांच्या हुकुमतीची चुणूक  दोघांनी दाखवून दिली. त्यांच्या प्रत्येक बंदिशीला रसिकांनी अगदी हात उंचावून टाळ्यांची दाद दिली. या कसदार वादनाला अलोकरथ चटर्जी व सत्यजीत तळवलकर यांनी तितक्याच दमदारपणे तबल्यावर साथसंगत केली.
शोभना चंद्रकुमार यांच्या भरतनाटय़मनेही महोत्सवात अनोखे रंग भरले. त्यांनी पाच रचना सादर केल्या. अप्रतिम पदन्यास अन् तितक्याच ताकदीच्या भावमुद्रा सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले. त्यांच्या शिष्या प्रीती मेहरा यांनी त्यांना गायनासाठी साथसंगत केली. मेहरा यांनीही एका रचनेवर नृत्य सादर केले. ‘‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात नृत्य सादर करायला मिळणे हे माझे व माझ्या शिष्यांचे भाग्य आहे,’’ अशी भावना शोभना यांनी या वेळी व्यक्त केली. महोत्सवातील बुधवारच्या सत्राचा समारोप पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने होणार असल्याने रात्री स्वरमंडप रसिकांनी तुडूंब भरला होता. विशेष म्हणजे यंदा राजन व साजन मिश्रा हे त्यांची दुसरी पिढी रितेश-रजनीश यांच्यासमवेत गाणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता होती. ही उत्सुकता पूर्ण करीत दिग्गज व नव्या पिढीतील या गायकांनी रसिकांना तृप्त केले. ‘‘१९७५ मध्ये आम्ही सवाईत गायन केले. आज आमच्या मुलांना पाहून त्या दिवसाची आठवण होते. त्या वेळी पंडित भीमसेनजी, वसंतराव देशपांडे आदी मंडळी समोर बसली होती. तेव्हा पुणेकरांनी आम्हाला आशीर्वाद दिले. त्याप्रमाणे आता आमच्या मुलांनाही आशीर्वाद द्या,’’ अशी भावना राजन मिश्रा यांनी व्यक्त केली.     
पं. रविशंकर यांना यंदाचा महोत्सव अर्पण
पं. रविशंकर यांना श्रद्धांजली म्हणून यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव अर्पण करण्यात आला असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. बुधवारच्या सत्राच्या सुरुवातीला पं. रविशंकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या वेळी त्यांच्यावरील एक ध्वनिचित्रफितही दाखविण्यात आली. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी या वेळी म्हणाले, ‘‘पं. रविशंकर यांचे सवाई गंधर्व महोत्सव व पंडित भीमसेन जोशी यांच्याशी जवळचे नाते होते. ते ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते.’’