देशसेवेचे प्रमुख साधन म्हणजे चारित्र्य निर्माण होय. देशाच्या प्रगतीसाठी निर्मल चारित्र्य आणि उच्च विचारांची गरज आहे. या विचारांमुळेच आपण आपले भविष्य घडवू शकतो, असे प्रतिपादन विठोबा इंडस्ट्रीजचे संचालक सुदर्शन शेंडे यांनी केले.
यशवंत स्टेडियम येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल आणि शिशू स्वयंसेवकांच्या विजयादशमी आणि शस्त्रपूजन कार्यक्रमाच्या वेळी  प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख हस्तीमल, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे आणि नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते.
 सुदर्शन शेंडे म्हणाले, राष्ट्रनिर्मितीची पहिली पायरी म्हणजे चारित्र्यनिर्मिती होय. आज इंटरनेटच्या युगात या यंत्राचा उपयोग आपले ज्ञान वाढविण्यसाठी केला पाहिजे. चांगले साहित्य आणि पुस्तकातून मनाला ऊर्जा प्राप्त होत असते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वच्छ आणि निर्मल मन  आणि उच्च विचारांची आवश्यकता आहे. शरीर आणि मन बलिष्ठ झाल्यास देशप्रगती करू शकेल. आज देशासमोर अनेक समस्या आहेत आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी प्रबळ आणि उत्साही नेतृत्वाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी हस्तीमल म्हणाले, भारताने कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही तर उलट सर्व जगाच्या सुखाचा विचार केला. आपले चारित्र्य आणि विचारांची दिशा नेहमी उन्नत ठेवली पाहिजे. लहान वयातच आपण शिकून गुणवान आणि धैर्यवान झाले पाहिजे. सुदृढ आणि चारित्र्यसंपन्न मुलेच बलशाली देश घडवू शकतात. प्रभूरामचंद्रांपासून तर विवेकानंदांपर्यंत सर्वानी आपल्या कृतीतून हाच विचार सांगितला. भारतभूमी ही धर्मभूमी आहे. तिचे पावित्र्य आपल्या चारित्र्यात आणून आपले जीवन चांगले केले पाहिजे हाच विजयादशमीचा संदेश होय, असे हस्तीमल म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर सांघिक गीतानंतर संचलन, दंडयोग, योगासन, लेझीम स्वयंसेवकांनी सदर केले. डॉ. दिलीप गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राम हरकरे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.