पतीने पत्नीला वा पत्नीने पतीला सोडून देऊन त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ त्याच्यापासून दूर राहणे म्हणजे एकप्रकारची क्रूरताच असल्याचा निर्वाळा देत चाळिशीतील दाम्पत्याला कुटुंब न्यायालयाने याच मुद्दय़ावरून नुकताच घटस्फोट मंजूर केला.
काही अज्ञात कारणास्तव पत्नी आपल्यापासून दूर राहत असल्याचा आणि तिची ही वागणूक क्रूरता असल्याचा दावा करत पतीने त्याचआधारे घटस्फोटाची मागणी केली होती. हे दाम्पत्य ५ डिसेंबर १९९५ मध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने त्यांचे वैवाहिक जीवन गुण्यागोविंदाने सुरू होते. पुढे पत्नी शिक्षिका म्हणून नोकरी करू लागल्यानंतर मात्र तिच्या वागणुकीत बदल होऊ लागला. ती काहीशी स्वार्थीपणाने वागू लागली. आपल्या दोन मुलांच्या संगोपनातही तिचे लक्ष नव्हते. त्यासाठी ती कधी फारशी उत्सुकही नव्हती. नंतर तर तिने आपल्याला सयुंक्त कुटुंबात राहायचे नसून स्वतंत्र संसार थाटायचा असल्याचा हट्ट धरला. तिचा हा हट्ट आपण मान्य करण्यास नकार दिला म्हणून एके दिवशी तिने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र संसार थाटण्याचा आग्रह मान्य केला जात नसल्याचे लक्षात आल्यावर २००२ला ती आपल्यापासून दूर झाली, असा दावा पतीने घटस्फोटाची मागणी करताना केला होता.
दुसरीकडे मात्र पतीचे हे सर्व आरोप खोटे असल्याचा आणि त्यानेच आपल्याला क्रूर वागणूक दिल्याचा दावा पत्नीतर्फे न्यायालयाकडे करण्यात आला. सासूसमोर पतीने आपल्याला कधीच आदराने वागवले नाही. परिणामी सासू नेहमीच आपल्याला शिवीगाळ करायची, असा आरोपही पत्नीने केला. आपण कमावत असल्याने पतीने घरच्या गोष्टींसाठी कधी लक्ष दिले नाही किंवा त्यासाठी कधी पैसेही दिले नाहीत. या सगळ्यांना आपण कंटाळल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आपली नव्हे, तर पतीची आपल्याप्रतीची वागणूक ही क्रूरता होती, असा दावा तिने करत घटस्फोटाची मागणी केली.
न्यायालयाने दोघांच्या बाजू ऐकल्यानंतर दोघांचीही एकमेकांप्रतीची वागणूक ही क्रूरताच असल्याचे स्पष्ट केले. पतीने घटस्फोटाच्या मागणीसाठी अर्ज केल्यानंतर पत्नीने पतीकडून आपल्याला दिली जाणारी वागणूक ही क्रूरता असल्याचा दावा केल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पत्नीने पतीला सोडले व दोन वर्षांहून अधिक काळ ती त्याच्यापासून दूर राहिली ही क्रूरताच असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.