कमानीतांडय़ाच्या किमतीत ३६ कोटींची वाढ
जळगाव जिल्ह्यातील कमानीतांडा प्रकल्पाची किंमत सुमारे ३६ कोटी तर अमरावती मध्यम प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात अमरावती प्रकल्पाचा कालावधी पुरेशा निधीअभावी १९ वर्षांनी लांबला असून ठेकेदाराच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याने प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाल्याचा ठपका जलसंपदा विभागाने ठेवला आहे. हा ठपका ठेवताना या विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई केली किंवा नाही, याची माहिती देण्याचे टाळले आहे.
कमानीतांडा प्रकल्पात सात साठवण तलाव, एक उन्नयी बंधारा व भरणा कालवा समाविष्ट असून त्यासाठी आवश्यक महसूल जमिनीच्या भूसंपादनासाठी सहा ते आठ वर्षे विलंब झाला. तसेच अपुऱ्या निधीमुळे प्रकल्प पूर्ण करणे शक्य झाले नाही. १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची भरण कालवा व साठवण तलाव, सोनाळा, लोंढरी, हिजऱ्यानाला, पाळधी ही कामे पूर्ण झाली आहेत. साठवण तलाव शेरीचे काम ९५ टक्के झाले व साठवण तलाव पिंपळगांव (गो) चे काम ८० टक्के झाले आहे. १९९७ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ४२.२१ कोटींवरून ७८.४९ कोटींपर्यंत पोहोचली. प्रकल्पाचा खर्च वाढला असला तरी प्रकल्प परिसरातील व खालील बाजूस असलेल्या विहिरींच्या जल पातळीत वाढ व पर्यायाने आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. प्रकल्प परिसरातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमरावती प्रकल्पाची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प काही किरकोळ कामांचा अपवाद वगळता पूर्णत्वास जात आहे. प्रकल्पाच्या मूळ किमतीत जवळपास ४५ कोटींनी वाढ झाली. पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. दुसरीकडे ठेकेदाराच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याचा ठपकाही या विभागाने ठेवला आहे. जमिनीच्या किमतीत झालेली वाढ, सविस्तर घटक संकल्पचित्रामुळे झालेली वाढ व इतर कारणांस्तव दरवाढीचा बोजा पडल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद केले आहे. अमरावती प्रकल्पाचे काम २००६-०७ मध्ये पूर्ण झाले. मातीधरण काम व सांडवा आदी १०० टक्के पूर्ण झाले असून डाव्या व उजव्या कालव्याची काही किरकोळ अपवाद वगळता बहुतांश कामे झाल्याचे म्हटले आहे. अमरावती प्रकल्पामुळे कोणतेही गावठाण बाधित होत नसल्याने पुनर्वसनाची तरतूद मूळ प्रकल्प अहवालात नव्हती. तथापि, २००६ मध्ये आलेल्या पुरानंतर मौजे वैदाणे गावातील काही घरांची पडझड झाल्याने बाधित घरांच्या निश्चितीकरिता महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्यामार्फत पश्चजल अभ्यास केला जात आहे. या प्रकल्पामुळे २७.७८ दशलक्ष घनमीटर जलसाठा तर ३१२७ हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामात ठेकेदार दोषी असूनही त्याच्यावर काय कारवाई केली अथवा कारवाई झालीच नाही, याची कोणतीही स्पष्टता करण्याचे या विभागाने टाळले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
अमरावती प्रकल्पाच्या विलंबाचा ठेकेदारावर ठपका
जळगाव जिल्ह्यातील कमानीतांडा प्रकल्पाची किंमत सुमारे ३६ कोटी तर अमरावती मध्यम प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात अमरावती प्रकल्पाचा कालावधी पुरेशा निधीअभावी १९ वर्षांनी लांबला असून ठेकेदाराच्या कामाची प्रगती असमाधानकारक असल्याने प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाल्याचा ठपका जलसंपदा विभागाने ठेवला आहे. हा ठपका ठेवताना या विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई केली किंवा नाही, याची माहिती देण्याचे टाळले आहे.

First published on: 21-12-2012 at 12:20 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor is responsible delay in amravati project