लातूर महापालिकेतील आठ-दहा अतृप्त नगरसेवकांचा गट ‘सीमोल्लंघना’च्या तयारीत आहे. या सर्व नगरसेवकांचा रोष ‘काँग्रेस’वर आहे. नागरी समस्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे अस्वस्थता आहे. ते नगरसेवकांवर चिडतात. पण नागरिकांसारखी चिडचिड नगरसेवकांना करता येत नाही. त्यामुळेच काही जणांनी उघड टीका केली. तर काहीजण फेसबुकच्या माध्यमातून सीमोल्लंघन करत आहेत.
लातूर महानगरपालिकेचा कारभार मान खाली घालावा असाच असल्याची जाहीर टीका माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली. तर काँग्रेसचे स्वीकृत सदस्य कुलदीप ठाकूर यांनी काँग्रेसवरच टीकेची झोड उठविली. शिवाजीराव पाटील कव्हेकर फिरून काँग्रेसमध्ये आलेले आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ‘स्वीकृत’ झालेल्या ठाकुरांची ही टीका ‘सीमोल्लंघन’ मानले जात आहे. ठाकुरांनी जाहीरपणे टीका केल्यानंतर आणखी एक नगरसेवक रवींद्र पाठक यांनी फेसबुकवर आपल्या भावनांना वाट मोकळी केली. पक्षांतर्गत त्यांची कृती ही ‘सीमोल्लंघन’ करणारी ठरविली जात आहे.  नगरसेवक दीपक सुळ हे आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत. तेही जोर लावत असतात. काही मंडळी उघडपणे सीमोल्लंघन करत असतानाच आठ-दहा अतृप्त नगरसेवकांचा गट ‘सीमोल्लंघन’ करण्याच्या तयारीत आहे. हा गट नेमका राष्ट्रवादीत जाणार की लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपात जाणार, ही चर्चा सुरू आहे.  केवळ चर्चा घडवून आणून अधिकचा लाभ पदरात पाडून गप्प बसण्याच्या मानसिकतेतही काही नगरसेवक असू शकतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे त्यांचा सीमोल्लंघनाचा नेमका आवाका किती, हे काही दिवसांतच समजेल.
लातूर शहरात अडचणीचा डोंगर असला तरी अडचणीचा बाऊ न करता गणेशोत्सवाच्या काळात अतिशय कठीण वाटणारे काम स्वयंसेवी संस्था व महापालिकेने एकत्रितपणे करून दाखवले. गेल्या महिन्याभरात ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक शहराची कॅरीबॅगपासून मुक्तता करण्यात लातूरकरांना यश आले आहे. व्यापारी, भाजीविक्रेते, फेरीवाले या सर्वाचा सहभाग थक्क करणारा आहे. तरीही नगरसेवक सीमोल्लंघनाच्या तयारीत आहेत.