जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड दि. ३ डिसेंबरला होणार आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्यभर मुदतवाढ मिळाल्याने तूर्त या हालचाली थांबल्या असल्या तरी आता नव्या पदाधिकाऱ्यांबाबत जिल्ह्य़ात कुतूहल आहे. ज्येष्ठ नेते तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक यशवंतराव गडाख यांच्यावर या शेवटच्या वर्षांत अध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता या वर्तुळात व्यक्त होते.
बँकेच्या संचालक मंडळाची मुदत येत्या डिसेंबर अखेरीस संपणार आहे. निर्धारीत मुदतीनुसार नवी निवडणूक झाली असती तर महिनाभरासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाला फारसे महत्व दिले गेले नसते. मात्र, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना राज्य सरकारने मार्च २०१३ पर्यंत मुदतवाढ देऊन निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यपदाच्या निवडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे.
बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा थोरात गट अशी युती असून हा गट गेले पाच वर्षे सत्तेत आहे. २४पैकी २० संचालक या गटाचे असून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटात ४ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये सुरूवातीलाच ठरल्यानुसार तीन वर्षे काँग्रेसच्या थोरात गटाला व दोन वर्षे राष्ट्रवादीला याप्रमाणे अध्यक्षपदाची वाटणी झाली होती. त्यानुसार दोघांचे हे रोटेशन पूर्ण झाले, मात्र, आता संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्याने शेवटचे वर्ष लांबणार आहे. गेले वर्षभर बाजीराव खेमनर (काँग्रेस-थोरात गट) अध्यक्ष व उदय शेळके (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष यांना संधी देण्यात आली. आता अध्यक्षपदावर पुन्हा राष्ट्रवादी दावा सांगेल अशी चिन्हे असून त्यामुळेच अध्यक्षपदासाठी ज्येष्ठे नेते यशवंतराव गडाख यांच्या नावाची चर्चा या वर्तुळात सुरू आहे.
मात्र, राष्ट्रवादी व थोरात गटाची बँकेत एकहाती सत्ता असल्याने फारशी खळखळ न होता ऐनवेळीच याबाबतचा निर्णय होईल, असे समजते.