शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेची जबाबदारी खांद्यावर घेऊन बाहेर पडलो असून त्यासाठी शिवसैनिकांनी लढवय्या वृत्तीने समाजात काम करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले.  
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंशी संवाद साधण्याच्या हेतूने आज नागपुरात आले असताना बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहातील मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, रामदास कदम, युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार नीलम गोऱ्हे, विदर्भ संपर्क प्रमुख विनायक राऊत, खासदार आनंदराव अडसुळ, भावना गवळी, प्रतापराव जाधव, दीपक सावंत, शेखर सावरबांधे यांच्यासह शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचे निधन होऊन एक महिना झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना, माझ्या भावंडांना आणि कुटुंबीयांना भेटावे, या उद्देशाने कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिकनंतर नागपुरात संवाद साधण्यासाठी आलो आहे. शिवसेनाप्रमुख गेल्याचे सर्व कार्यकर्त्यांंना दुख असले ते गिळून आता बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विधानसभेवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी कामाला लागले पाहिजे.
नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून ज्या नेत्यांचे चेहरे पाहावेसे वाटत नाही अशा नेत्यांचे फलक शहरात लावण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारू शकत नाही. शिवसेनाप्रमुख एकच होते आणि यापुढे ते जिवंत नसले तरी आपल्यातच राहणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचा पदभार स्वीकारला असता तर माझ्यावर घराणेशाहीचे आरोप झाले असते, मात्र त्या आरोपांना मी घाबरत नाही. जोपर्यंत कडवा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख राहणार आहेत.
बाळासाहेबांनी कधीच सत्तेची आणि पदाची अभिलाषा ठेवली नाही. जे आहे ते आयुष्यभर देत गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांंना घडविले. आमच्यावर तेच संस्कार केले आहेत. बाळासाहेबांची जी काही स्वप्ने होती ती पूर्ण केल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. त्यांनी खांद्यावर भगवा दिला आहे. हा भगवा म्हणजे केवळ साधे कापड नाही. ते कोटय़वधी लोकांचे श्रद्धास्थान आहे.
जबाबदारी मोठी असली तरी तुमच्यासारख्या शिवसैनिकांमुळे ती खांद्यावर घेतली आहे. मी तुमच्यासमोर रडायला किंवा दुख व्यक्त करायला आलेलो नाही, तर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन घेऊन मी बाहेर पडलो आहे. देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंग कडेकोट बंदोबस्तात काचेच्या घरात बोलतात, मात्र शिवसेनाप्रमुखांनी कुठलेही सुरक्षा कवच आजूबाजूला न ठेवता कार्यकर्त्यांंशी संवाद साधलेला आहे.
एक माणूस केवढी मोठी शक्ती निर्माण करू शकतो, हे बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या गर्दीने दाखविले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी सुभाष देसाई आणि रामदास कदम यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात भगवा फडकविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांंना केले.    

सर्व वादांना जानेवारीनंतर उत्तर
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सध्या जे काही विनाकारण आरोप किंवा वाद केला जात आहे त्याला उत्तर देण्यासाठी आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी जानेवारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरा करणार असून फेब्रुवारीत विदर्भाच्या उपराजधानीत शिवसैनिकांचे संमेलन आणि मेळावा घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी  सांगितले.