जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला असून इगतपुरी तालुक्याच्या घाटमाथ्यासह पश्चिम भागात मागील ४८ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली. भावली धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दारणा नदीला पूर आला असून काठालगतची शेती पाण्याखाली गेली आहे. काकुस्ते रस्त्यावरील दारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे मध्यरात्रीपासून १४ गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. दुसरीकडे वाकी खापरी धरणाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे ५० हून अधिक गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिपरिप तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ या तालुक्यांत संततधार सुरू आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला. नाशिक शहर व परिसरात सलग १५ तास संततधार सुरू आहे. पावसामुळे दैनंदिन जीवन कोलमडून पडले. इतर भागांतही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. पावसाचे माहेरघर म्हणून या तालुक्याची ओळख. घाटमाथा व पश्चिम पट्टय़ात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणा नदीचे उगमस्थान असलेल्या भावली धरण परिसरात ४१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे घोटी शहराजवळील रहदारीचा काळुस्ते पूल पाण्याखाली गेला. परिणामी, या भागातील काळुस्ते, कांचनगाव, औचितवाडी, शेणवड, खडकवाडी, तळोघ, जुन्हावने, भरवज, निरपण, कुरुंगवाडी, मांजरगाव, बोरवाडी, दरेगाव, सारुक्तेवाडी आदी गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, घोटी-वैतरणा रस्त्यावर नवीन वाकी खापरी धरणात या वर्षांपासून पाण्याचा साठा केल्याने धरणाचे पाणी कोपरगाव आणि भावली गावाजवळील रस्त्यावर आले. हा प्रमुख रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला. या आपत्कालीन स्थितीच्या पाश्र्वभूमीवर मात करण्यासाठी प्रशासनाने दोन्ही ठिकाणी जीवरक्षक तैनात केले आहेत. वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जाणारा रस्ता पाणी साठल्यानंतर पाण्यात जाणार याची कल्पना असूनही शासनाने पावसाळ्यापूर्वी पर्याची रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट ठेवल्याने धरणातील पाणी रस्त्यावर येऊन अनेक गावांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातही संततधार सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. इतर भागांतही पावसाची संततधार सुरू आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दुपारी काहीशी विश्रांती घेतली. त्र्यंबकमधील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील जलसाठा उंचाविण्यास मदत होईल. मागील चोवीस तासांत दारणा धरण परिसरात ६७ मिलिमीटर, गंगापूर ९०, काश्यपी ५८, गौतमी गोदावरी १००, आळंदी ५३, कडवा ६५, भोजापूर ४०, करंजवण ३७, पालखेड २२ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. पावसामुळे धरणातील जलसाठय़ात वाढ होण्यास हातभार लागणार आहे.