महिला अत्याचाराच्या घटनांत नेपाळमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. अत्याचारांच्या बातम्या देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमधून येत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. यावर आमचा काम करण्याचा प्रयत्न आहे. स्त्री अत्याचाराविरुद्ध आम्ही काही ठिकाणी प्रशिक्षण वर्ग चालविले आहेत, अशी माहिती उर्मिला भट्ट यांनी दिली.
सध्या निवडणुकीचे नेपाळमध्ये दिवस सुरू असून माओवादी बळजबरीने सत्ता हस्तगत करत असले तरी नेपाळच्या विकासासाठी भारताची गरज असल्याचे तेथील विद्यार्थ्यांना मनापासून वाटते, असे प्राज्ञिक विद्यार्थी परिषदेच्या महामंत्री उर्मिला भट्ट यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी परिषद रविनगरातील पूजा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने त्यांनी पत्रकार परषिदेत चर्चा करताना माहिती दिली. नेपाळच्या प्रतिनिधी मंडळासोबत परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या आल्या आहेत. यानिमित्ताने नेपाळमधील विद्यार्थी आंदोलनाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
नेपाळमध्ये नेपाळी कॅलेंडरप्रमाणे २०५१ म्हणजे १९९६ मध्ये प्राज्ञिक विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. २००८ मध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांनी संघटनेच्या सक्रिय सदस्य म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी स्वत:ला झोकून दिले. नेपाळमधील ९ विद्यापीठांपैकी ६ विद्यापीठात काम सुरू आहे असेही त्या म्हणाल्या. नवनवीन गोष्टी शिकविणय्बरोबरच राष्ट्रनिर्मिती विषयी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. पूर्वी आमचा देश हिंदू राष्ट्र होता. राजसत्ता आता संपुष्टात आली असली तरी आजही लोकांना आपला देश हिंदू राष्ट्र असावा असेच वाटते. अधिकाधिक विद्यार्थी माओवाद्यांच्या विरोधात आहेत. नेपाळशी भारताचे संबंध अधिक दृढ व्हावे, अस त्यांना वाटते, असेही त्यांनी सांगितले.
नेपाळ आणि भारत यात विशेष फरक नाही. येथील विद्यार्थ्यांना भारताकडून खूप अपेक्षा आहेत. माओवाद्यांचे देशात वर्चस्व वाढत आहे. लोकांच्या अपेक्षा राजसत्ता संपुष्टात आल्यावर वाढल्या होत्या, पण त्या अपेक्षा फोल ठरल्या. विद्यार्थ्यांचा ओढा भारताकडे असल्यामुळे विद्यार्थी संघटनेचे धडे घेण्यासाठी आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.